MB NEWS-नागरिकांत तीव्र असंतोष:दोन दिवसापासून गणेशपार विभागात अंधार !
नागरिकांत तीव्र असंतोष:दोन दिवसापासून गणेशपार विभागात अंधार !
परळी वैजनाथ (प्रतिनीधी)...
गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरांमध्ये कधी तांत्रिक तर कधी कृत्रिम अडचणीमुळे विजेचा लपंडाव सुरू असून याचे अधिकारी वर्ग, विद्युत मंडळ यांना कसलेही सोयर सुतक नाही. जुन्या गावभागातील गणेशपार या ठिकाणचे विद्युत रोहित्र (डीपी) रविवार दुपारपासून नादुरुस्त झाल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली असून विद्युत मंडळाच्या गलथान कारभाराविरुद्ध नागरिकांत रोष पसरलेला पहावयास मिळत आहे. गेल्या दोन दिवसापासून या भागातील नागरिकांना विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे केवळ नियोजना अभावी अंधाराचा सामना करावा लागत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशपार भागातील डीपी रविवार दुपारपासून अचानक नादुरुत झाली. नागरिकांनी फोनवर व विद्युत विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या परंतु रोहित्र (डीपी) उपलब्ध नसल्याचे कारण देत विद्युत मंडळाने रविवार पासून या भागातील नागरिकांना अंधारात ठेवले आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने साठलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असल्याने व त्यात लाईट अभावी पंखे बंद असल्याने नागरिकांचे हाल होत असुन एक प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार चालू आहे. अजूनही डीपीच न आल्याने या भागातील नागरिकांना अजून किती काळ अंधकारात घालवावा लागणार हे माञ समजू शकत नाही. विद्युत मंडळाने मान्सूनपूर्व लाईन चेकिंग, तारा वर आलेली झाडे तोडणे, वाकलेले खांब दुरुस्ती अशी कामे न केल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात डीपी नादुरुस्त झाल्याने नागरिक प्रचंड संताप व्यक्त करीत असुन याबाबतीत विद्युत मंडळाने मात्र कुंभकर्णी निद्रेचे सोंग घेतल्याचे दिसत आहे.
विज बिल वसुली सक्तीची; अन्यथा विद्युत पुरवठा खंडित...!
सक्तीची विज बिल वसुली करणाऱ्या विद्युत मंडळाचे वसुली पथक थोड्याश्या थकबाकीसाठी सर्वसामान्यांचा विद्युत पुरवठा खंडित करते. मात्र तांत्रिक अथवा कृत्रिम कारणामुळे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अथवा रोहित्र बिघाड असे प्रश्न उद्भवल्या नंतर विद्युत मंडळ मात्र वेळेत दुरुस्ती करण्याचे औदार्य दाखवत नाही. काही महिन्यांपूर्वीच गणेशपार येथील डीपी बदलण्यात आली होती, तरीही ती एवढ्या लवकर नादुरुस्त कशी होते असा सवाल करत तब्बल दोन दिवसांपासून शहरातील प्रमुख भागात लाईट नाही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतुन जोर धरू लागली आहे. दरम्यान रोहित्र नादुरुस्त झाल्याच्या कारणामुळे गावभागातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना व मनस्ताप सहन करावा लागत आहे. एरव्ही सामान्यांचे कैवारी म्हणून घेणारे व लहान सहान गोष्टीतून सवंग लोकप्रियता मिळवणाऱ्या लोकप्रतिनिधीना देखील या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे पाहावयास मिळत आहे.
@@@
विद्युत मंडळाचे परळी येथील अभियंता अंबाडकर यांच्याशी संपर्क साधला असता गणेशपार भागातील विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यासाठी नविन रोहित्राची (डिपीची) गरज असून परळीत डीपी सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन रोहित्रासाठी आम्ही अंबाजोगाई कार्यालयाकडे पाठपुरावा केला असून मंगळवार सकाळ पर्यंत डीपी उपलब्ध होईल व त्यानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती त्यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा