पालकांनी मुलांच्या शिक्षणावर जागता पहारा ठेवावा..! दिशाहीन होण्यापासून मुलांना वाचवणे ही पालकांचीही जबाबदारी - राम कुलकर्णी अंबाजोगाई (प्रतिनिधी) पालकांनी मुलांना महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठविले म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे न समजता त्यांच्या शिक्षणाबरोबरच संगत, सवयी, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व विकासाकडेही जागरूकतेने लक्ष द्यावे. अकरावी - बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, या काळात मुलांना दिशाहीन होण्यापासून वाचविण्याची जबाबदारी पालकांचीही आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांनी केले. खोलेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, अंबाजोगाई येथे शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात आयोजित पालक मेळावा - २०२६ मध्ये मार्गदर्शक तथा उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.दीपक फुलारी होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड, डॉ.बिभीषण फड, उपप्राचार्य आनंद पाठक, पर्यवेक्...