Beed news | रेंगाळलेल्या रस्ता कामाची धूळ शेतात, पिकांची वाढच खुटंली, शेतकऱ्याने संतापून मिरची - पपईची झाडे उपटून टाकली! दिंद्रुड : बीड–परळी महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामामुळे उडणाऱ्या धुळीचा फटका रस्त्यालगतच्या शेतीला बसत असून, धारूर तालुक्यातील भोपा येथील एका शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्याने सोमवारी स्वतःच्या शेतातील पपई व मिरचीची उभी पिके अक्षरशः उपटून टाकली. बीड–परळी महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, तिचा परिणाम रस्त्याशेजारील पिकांवर होत आहे. भोपा येथील शेतकरी रवी वाघचौरे यांनी सव्वा एकर क्षेत्रात मार्च महिन्यात पपई व मिरचीची लागवड केली होती. मात्र, रस्त्यावरील धूळ सतत पिकांवर साचत गेल्याने पिकांना विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. पिकांवर अनेक वेळा औषध फवारणी करूनही अपेक्षित परिणाम झाला नाही. धूळ पानांवर साचल्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. परिणामी पिकांची वाढ खुंटली आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता कमी झाली. अखेर उत्पादनाची आशा संपुष्टात आल्याने श...