*महिलांच्या सबलीकरणातूनच येईल ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी*- *ना.पंकजा मुंडे
अलिबाग,जि. रायगडदि.27-
ग्रामीण भागात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनातून निर्माण होणाऱ्या सबलीकरणातूनच आर्थिक समृद्धी येईल, त्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि मिलाप च्या माध्यमातून महिला बचत गटांच्या चळवळीला पाठबळ देऊन येत्या दोन वर्षात पाच लाख महिला बचत गट स्थापन करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला बालविकास मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी आज खारघर येथे केले.
खारघर नवी मुंबई येथील उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिलाप (Mahaasmita Innovative Livelihood Acceleration Programm) या नाविण्यपूर्ण उपजिवीका गतिवर्धक कार्यक्रमाचे व ग्रामविकास विकास विभागाने बांधलेल्या 30 दुकान गाळ्यांच्या लोकार्पण सोहळा आज राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला.
या सोहळ्यास खा.श्रीरंग बारणे, आ.निरंजन डावखरे, आ.प्रशांत ठाकूर,पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, फिक्कीचे चेअरम्न निखिल अग्रवाल, अति. संचालक रुबाब सूद, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना. मुंडे म्हणाल्या की, महिला ही माता असते, त्यामुळे ती हिम्मत कधीच हरु देत नाही. या ग्रामीण भागातील महिलांमधील उद्यमशक्तीला चालना देण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून विविध व्यवसायात या महिला पुढे येत आहेत. आतापर्यंत या महिलांनी घेतलेल्या व्यवसाय कर्जापैकी 99 टक्के कर्जाचा परतावा केला आहे. त्यामुळे बॅंकांनी महिलांना अर्थसहाय्य देऊन पाठबळ द्यावे. या महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना शहरी भागात बाजारपेठ मिळावी यासाठी येथील 30 गाळ्यांमध्ये त्यांना रोटेशन पद्धतीने जागा उपलब्ध करुन दिली जाईल. दर 15 दिवसांत या महिला येथे येऊन आपली उत्पादने विक्री करु शकतील. या शिवाय या महिलांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी यासाठी फिक्कीसारख्या संस्थेबरोबर सांमजस्य करार करण्यात आला असून त्यासाठी ऑनलाईन पोर्टल विकसित करुन त्यांना जगाची बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाईल, असेही ना. मुंडे म्हणाल्या. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या या चळवळीला बळकटी देऊन ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट्य आहे.
यावेळी मिलाप या पुस्तिकेचे प्रकाशन ना. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले तर त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व फिक्की यांच्यात सांमजस्य करार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांना ना. मुंढे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यात राणी लक्ष्मी बाई ग्रामसंघ, मु. जीमलगट्ता एटापल्ली जि. गडचिरोली, वैष्णवी महिला स्वयंसहाय्यता गट चिंधीचक ता. नागभीड जि. चंद्रपूर, सावित्रीबाई फुले स्वयंसहाय्यता गट वारणी ता. शिरूळकासार जि. बीड या गटांचा समावेश होता. तसेच पशुसखी रंजना कांबडी, कोडा ता. घाटंजी जि. यवतमाळ,उद्योजक लक्ष्मी शेंडे वर्धा, लघु उद्योजक सल्लागार श्रीमती कमल कुंभार उस्मानाबाद यांना सन्मानित करण्यात आले. तर या अभियानाचे गट समन्वयक विकास पंडीतकर यांच्या अपघाती निधनाबद्दल त्यांच्या पत्नी श्रीमती वर्षा पंडीतकर यांना पाच लक्ष रुपयांचा विमा रकमेचा धनादेश देण्यात आला. तसेच महिला स्वयंसहाय्यता गटांना अर्थ सहाय्य करणाऱ्या बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयडीबीआय, एचडीएफसी, महाराष्ट्र ग्रामिण बॅंक, विदर्भ ग्रामिण बॅंक यांनाही सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले. यावेळी फिक्कीचे चेअरमन निखील अग्रवाल, खा. श्रीरंग बारणे, आ. प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले. तर रविंद्र शिंदे यांनी आभार मानले.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा