पुण्यश्लोक अहिल्यादेवी माझ्या आदर्श : जनतेची सेवा करताना सात्विकता ढळू देणार नाही
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
पंतप्रधानांकडून जिल्हयात मोठा उद्योग हट्टाने घेऊन येण्यासाठी माझा प्रयत्न असेल
धारूरच्या धनगर समाज मेळाव्यात पंकजाताई मुंडेंनी दिला शब्द
पुण्यश्लोक अहिल्यादेवी माझ्या आदर्श : जनतेची सेवा करताना सात्विकता ढळू देणार नाही
धारूर ।दिनांक १३।
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहेत, यात कुठलीही शंका नाही. ही निवडणूक कुठल्या कारणासाठी नाही. यातून मला काही मिळावं हे देखील माझं स्वप्न नाही. तथापि जिल्हयातील दहा हजार युवकांना रोजगार मिळेल असा एखादा मोठा उद्योग पंतप्रधानांकडून हट्टाने जिल्हयात घेऊन यायचा आहे, कॅन्सर रुग्णांसाठी मल्टिस्पेशालिटि हॉस्पीटल उभा करायचयं. या जिल्हयाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मला आशीर्वाद द्या. आपलं मतदान योग्य पारड्यात टाका असं आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माधवराव निर्मळ यांनी आयोजित केलेल्या जिल्हयातील धनगर समाज बांधवांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. माजी आमदार आर टी देशमुख, केशवदादा आंधळे, रमेश आडसकर, नगराध्यक्ष डाॅ. स्वरूपसिंह हजारी, उदयसिंह दिख्खत, राम कुलकर्णी, रामकृष्ण घुले, लक्ष्मण सिरसाट, कल्याण आबुज, बाळासाहेब चोले आदी यावेळी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी माझ्या आदर्श आहेत. आयुष्यात त्यांच्या वाटयाला खूप संघर्ष आला,पण सात्विकता न सोडता त्यांनी समाजाची सेवा केली. माझ्याही वाटयाला तसाच संघर्ष आला, शेवटच्या श्वासापर्यत समाजाची सेवा करायची पण सात्त्विकता ढळू द्यायची नाही हे मी राजकारणात ठरवलं आहे, असं पंकजाताई म्हणाल्या. मी निवडणूकीत उभी आहे. मला मतदान का करायच? असा प्रश्न माझा शत्रू देखील विचारू शकत नाही असं काम तुमच्या या लेकीने जिल्हयात केलंय. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सोशल इंजिनिअरिंग लोकनेते मुंडे साहेब करायचे, तसाच प्रयत्न माझाही आहे. असं त्या म्हणाल्या.
वाडी-वस्ती तांडयापर्यत योजना पोहोचवल्या
-----
पालकमंत्री पदाच्या काळात खूप संघर्ष झाला, त्यावेळेस जे टिका करायचे आज ते सोबत आहेत ही देवाचीच किमया आहे. मी त्याकाळात राबविलेली प्रत्येक योजना गोरगरिब, सर्व सामान्य घटकांना न्याय देणारी होती. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना वाडी, वस्ती, तांडयापर्यत पोचवली. जलयुक्त शिवारचं मोठं काम केलं. अहिल्यादेवींच्या नावाने सामाजिक सभागृह बांधले. विकास करताना कुठलाही भेदभाव केला नाही असं त्या म्हणाल्या.
मुद्दे नसले की निवडणूक जातीवर
------
कुठलेच मुद्दे नसले की निवडणूक जातीवर जाते. आता आरक्षणाचा मुद्दा निर्माण झालाय. या विषयावर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे, ते नक्की पूर्ण करतील. पण ही निवडणूक संसदेची आहे आणि तो विषय राज्याच्या सभागृहाचा आहे. मराठा समाजाला टिकणार आणि संविधानात बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे असं पंकजाताई म्हणाल्या. या निवडणूकीत जिल्ह्याचा कसा विकास साधायचा यावर विचार केला गेला जावा. संसदेत गेल्यावर अदानी, अंबानी सर्व जण नावाने ओळखतील. मोदींनी सांगितलं तर एखादा उद्योग बीडमध्येही येऊ शकतो, त्यात आपल्या जिल्हयाचं कल्याणच होईल यासाठी आपलं मतदान योग्य पारड्यात टाका, मला आपली साथ आणि आशीर्वाद द्या असं आवाहन पंकजाताईंनी यावेळी केलं.
मायेच्या घोंगडीचं प्रेम कधीही विसरणार नाही
------
यावेळी येळकोट, येळकोट, जय मल्हारची घोषणा देत धनगर समाजाच्या वतीने पंकजाताईंचा घोंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला. आपण मला मायेने घोंगडी दिली आहे, हे प्रेम भविष्यात कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही माझ्याशी जोडला गेला
आहात, तुम्हाला कधी अंतर देणार नाही अशा भावना पंकजाताईंनी यावेळी व्यक्त केल्या. लोकनेते मुंडे साहेबांनी व आपण धनगर समाजाचा नेहमीच सन्मान केला आहे, समस्त समाज आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे असा शब्द समाज बांधवांनी याप्रसंगी त्यांना दिला.
•••
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा