गात जा गा गात जा गा l प्रेम मागा विठ्ठल ll


गात जा गा गात जा गा l

प्रेम मागा विठ्ठल ll

अशी प्रेमाची साद घालीत शेकडो दिंड्यातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. कुणाचेही निमंत्रण नाही आणि कुणाचेही नियंत्रण नाही. तरीही लाखोंचा हा समूह दर रोज आपला मुक्काम बदलत पायी वाटचाल करतो. या प्रवासात कुणी कुणाला जात विचारीत नाही. कुणी कुणाला धर्म विचारित नाही, कुणी कुणाला कोणत्या भागातून आलास म्हणून विचारित नाही, कुणी कुणाला स्री अथवा पुरुष आहे म्हणून वेगळी वागणूक देत नाही. वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे प्रदेश यातून आलेली मंडळी पण एकमेकांशी एकजीव होऊन जातात. 22 दिवसांच्या प्रवासात कुणाचीच कुणा विरोधात कोणतीच तक्रार नसते. कुणीच कोणती शिस्त मोडत नाही. या सर्वांना एका सूत्रात बांधणारे कोणते बळ आहे? तर ते बळ आहे प्रेमाचे! बंधुत्वाचे!

 प्रेम प्रितीचे बांधले l

ते न सूटे काही केले l

पंढरीच्या वारीमध्ये भक्तांच्या मध्ये परस्पर जसा प्रेमभाव आहे, तसाच तो देव आणि भक्तामध्येही आहे. इतर तिर्थक्षेत्राला गेलेले भाविक नवस करतात, आपल्या इच्छा पूर्ण झाल्या तर ते नवस फेडतातही! इच्छा पूर्ण झाली नाही की, तिकडे पुन्हा फिरकत नाहीत. पण पंढरपूरच्या पाडुरंगाकडे कोणीही भौतिक सूखासाठी कोणताही नवस करीत नाहीत. इथे अपेक्षा नसल्यामुळे अपेक्षा भंग होत नाही. इथे एकच अपेक्षा असते ती म्हणजे प्रेमाची. इथे ज्ञान, ब्राह्मज्ञान सुद्धा गौण ठरते. 

तुकाराम महाराज सरळ देवाला सांगतात-

भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा l

अभिमान नित्य नवा तया माजी ll

भक्तीच्या वाटेवरून चालणा-या माणसाला ब्रह्मज्ञानाची ओढ असते. ते ब्रह्मज्ञान मिळविण्यासाठी मग कुणा तर मध्यस्थाची मदत घेतली जाते. पंढरीच्या वारक-यांना मात्र ब्रह्मज्ञानाचीही अपेक्षा नसते. ते भगवंताला सरळ सांगतात-

नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव l

मी भक्त तू दे ऐसे करी ll

हा सर्व व्यवहार प्रेमाचा आणि बंधुभावाचा असल्यानेच 22 दिवसांच्या प्रवासात सर्वजण अनेक गैरसोयी असतानाही कोणतीही तक्रार करीत नाहीत. पोलीस हस्तक्षेपाची गरज उरत नाही.

बंधुत्वाची ही ताकद डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखलेली होती आणि म्हणूनच त्यांनी संविधानामध्ये समता आणि स्वातंत्र्याबरोबर बंधुत्वाचा समावेश केला. संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात त्यांनी बंधुत्वाला विशेष महत्व दिल्याचे दिसते. समता, स्वतंत्र आणि बंधुत्व यांचे परस्परांशी असणारे नाते स्पष्ट करताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समता, स्वतंत्र आणि बंधुत्व यापैकी एकाची दुस-या पासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरीत्या अस्थित्वात रहाणार नाहीत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांची गरज भाषेल.'

पंढरीच्या वाटेवर लाखोंचा जनसमुदाय पोलिसी हस्तक्षेपाशिवाय स्वयंशिस्तीने चालतो तेव्हा डाॅ. आंबेडकर यांची अपेक्षा वारी पुरती तरी पूर्ण झालेली दिसते. वारीत दिसणारा हा एकोपा जेव्हा प्रत्यक्ष समाज दिसेल त्या दिवशी संतांचे स्वप्न साकार झाले, असे म्हणता येईल.

जात, धर्म, वर्ण, वंश याच्या पलिकडे जाऊन एक प्रगल्भ मानवी समाज निर्मितीच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणून संत परंपरेकडे पहावे लागेल. ही संत परंपरा अचानक आणि सहज निर्माण झाली असे म्हणता येणार नाही. तर ती तत्कालीन समाजाची गरज होती. धार्मिक कर्मकांड आणि वर्णव्यवस्थेने  केलेली कोंडी फोडण्याच्या दिशेने टाकलेले ते पाऊल होते, असे म्हणावे लागेल. संतांच्या प्रबोधन चळवळीपूर्वी धार्मिक सत्ता विशिष्ट वर्गाच्या हातात होती आणि या धार्मिक सत्तेचे अप्रत्यक्ष नियंत्रण राजसत्तेवर होते. धर्माचरणाचे जे ग्रंथ होते ते सर्व संस्कृतमध्ये होते. संस्कृत भाषाही विशिष्ट वर्गालाच अवगत होती. त्यामुळे त्या ग्रंथाचा अर्थ आपल्या सोईने लावून समाजाला आपल्या ताब्यात ठेवले जात होते. किचकट कर्मकांडाच्या माध्यमातून समाजाचे शोषण केले जात होते. संतांच्या प्रबोधन चळवळीने पहिल्यांदा अध्यात्मिक साहित्य लोक भाषेत आणले आणि त्यानंतर किचकट कर्मकांडांना सोपे पर्याय दिले.


ज्ञान हे संस्कृतच्या बंधनातून मुक्त करुन जनभाषेत आणण्याची सुरुवात दक्षिणेतील संत परंपरेपासून झाली. इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंत तामिळनाडूमध्ये वैष्णव अळवार संत परंपरा रुजली आणि विकसित झाली. या अळवार संतांनी संस्कृतीच्या जोखडातून भक्ती परंपरेला मुक्त करीत जनभाषेचा भक्कम आधार दिला. इतकेच नव्हे तर आमची जनभाषा आम्ही ज्ञान भाषा करू, असा निर्धार अलवार संतांनी केला. तमिळ भक्ती परंपरेत चार अळवारांना विशेष मान आहे. त्यातील भूत्तम अलवार आपली मातृभाषा असलेल्या तमिळ भाषेला ज्ञान भाषा करण्याची प्रतिज्ञा करतात. त्यांनी तमिळमध्ये लिहिलेल्या काव्याचा मराठी अनुवाद असा आहे की,

प्रेम असते जळणा-या दिव्या समान 

त्यातील तेल असते मनातील इच्छा 

शाश्वत सुरात विरघळून जाणारे मन

असते त्याची वात 

मी पेटविली आहे

प्रकाशमान ज्ञानज्योत *तामीळ भाषेत*

तिला लावले आहे कामी नारायणासाठी!


तामिळनाडू मधील अलवार संतांनी जनभाषेत साहित्य निर्मितीला प्रारंभ केल्यानंतर त्याचा प्रभाव बाजूच्या कर्नाटकातील संत परंपरेवर पडला. अगोदर संस्कृत मध्ये असणारी विविध पुराणे पंपा आणि रान्ना या दोघांनी  कानडीमध्ये आणली. पुढे बसवण्णा, अक्कामहादेवी आणि अलम प्रभू या वीरशैव संतांनी आपली वचने तेथील लोक भाषेत म्हणजे कानडीत लिहिली. त्याच प्रभावातून चक्रधर स्वामींच्या शिष्यांनी मराठीत रचना करायला सुरुवात केली. अर्थात ज्यांना ज्ञान हे संस्कृतच्या कडीकुलूपात बंद ठेवायचे होते. त्यांनी अशा मराठी साहित्य निर्मितीला विरोध केला. तेव्हा चक्रधर स्वामींच्या शिष्यांनी खणखणीत मराठीमध्ये सुनावले की, 

तुमचा अस्मात कस्मात मी नेणे गा :

मज चक्रधरे निरुपिली म-हाटी :

तियासिचि पुसा :

तुमचं संस्कृत मधील अस्मात कस्मात आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला चक्रधर स्वामींनी मराठी सांगितलेली आहे. तुम्हाला काही विचारायचे असेल तर त्यांना विचारा.

त्या पुढे वारकरी संप्रदायाचा पाया असणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी तर अमृताशी पैज लावली तर माझी मराठीचं जिंकेल असा दृढ विश्वास  व्यक्त  करीत साहित्य निर्मिती केली. ज्ञानेश्वर महाराज लिहितात- 

माझा म-हाटाचि बोलू कवतूके l

अमृतातेही पैजा जिंके l

ऐशी अक्षरे रसिके l

मेळविनll

मराठीचा गौरव करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-

हां हो नवल नोहे देशी l

म-हाटी बोलिजे तरी ऐसी l

वाणे उमटत आहे मा आकाशी l

साहित्य रंगाचे ll

म्हणजे संस्कृतध्येच लिहिण्याचे, बोलण्याचे जे बंधन होते ते ढिले करून मराठीत ज्ञान प्रवाहित करण्याचे महान कार्य संत चळवळीने केले. ज्ञानेश्वर महाराज यांनी संस्कृतच्या बंधनांत अडकलेली गीता मुक्त केल्याबद्दल संत मंडळानेही ज्ञानेश्वर महाराज यांचा गौरव केला आहे. संस्कृतमधील गीतेवर भाष्य करताना मराठीतील 56 बोली भाषांचा गौरव केला असल्याचा निर्वाळा देताना नामदेव महाराज म्हणतात-

गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी l

ब्रह्मानंद लहरी प्रकट केली ll

अध्यात्म विद्येचे लाविलेसे रोपl

चैतन्याचा दीप उजळीलाll

छप्पन्न भाषेचा केलासे गौरव l

भवार्णवी नाव उभारीली ll

दुस-या एका अभंगात संस्कृताची गाठ सोडून गीता देवी मराठीत आणल्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज यांचा गौरव करताना नामदेव महाराज  म्हणतात 

संस्कृताचि गाठी l

उघडोनी ज्ञान दृष्टी l

केलीसे मराठीl

गीता देवी ll

तर आधुनिक कवी मुरलीधर नारायण गुप्ते ऊर्फ कवी बी यांना तर संस्कृतमध्ये बांधून ठेवलेले ज्ञान मराठीमध्ये लिहिण ही बंडखोरी आहे, असे वाटते. इथल्यासामाजिक आणि धार्मिक सुधारणांवर भाष्य करणारी कवी बी यांची डंका नावाची कविता आहे.  या कवितेत कवी बी म्हणतात -


*त्या बड्या बंडवाल्यात*

 *ज्ञानेश्वर माने पहिला;*

*मोठ्यांच्या सिद्धांतांचा*

*घेतला पुरा पडताळा,*

संस्कृत भाषेत ज्ञान अडकल्यामुळे ते मूठभर लोकांच्या पुरतेच मर्यादित होते. सर्व सामान्यांना ते कळत नव्हते. अपसूकच त्यामुळे संस्कृत न कळणारांमध्ये न्यूनगंड निर्माण होत होता. तर ज्यांना ही  भाषा येत होती, त्यांना अहंगंड निर्माण होत होता. मग संस्कृत येणारे उच्च समजले जात, तर न येणारे आपोआपच कनिष्ठ ठरत होते. म्हणूनच लोक भाषेत साहित्य निर्मिती झाल्याने ते ज्ञान सर्वांसाठी खुले झाले. 

एकीकडे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी संस्कृतधील ज्ञान मराठीत आणून बंडखोरी केली तर तिकडे पंढरपूरात संत नामदेव महाराज यांनी "अभंग" हा सोपा काव्य प्रकार मराठीत प्रचलित करून धार्मिक साहित्याला मराठी भाषेच्या अंगणात आणखी मुक्तपणे बागडण्याचा मार्ग मोकळा केला. पुढे कीर्तनातून अभंगांचे निरुपण करून भक्ती पंथ अधिक सोपा केला. या कीर्तनाचा उद्देशही सांगताना नामदेव महाराज म्हणतात आम्ही जे कीर्तनात नाचणार आहोत ते मोक्ष मिळविण्यासाठी नाही, वैकुंठाला जाण्यासाठी नाही, मुक्ती मिळण्यासाठी नाही तर आम्ही ज्ञानाची ज्योत पेटविण्यासाठी कीर्तनात नाचणार आहोत.

नाचू कीर्तनाचे रंगी l

ज्ञानदीप लावू जगी ll

असे सांगत  कीर्तनातून ज्ञानाची ज्योत पाजळून प्रकाश बीजे रुजविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असा विश्वास दिला. नामदेव महाराज यांनी अभंग हा काव्य प्रकार लिहिला. इतरांनाही तो लिहिता यावा म्हणून अभंग कसे लिहावेत याचे मार्गदर्शन करणारे काही अभंग नामदेव महाराज यांनी लिहिले. भक्ती मार्ग सांगणारे, आपल्या मनातील भावभावनांना वाट करून देणारे अभंग हे माध्यम अत्यंत अल्प कालावधीत लोकप्रिय झाले. अनेकजणांचा युगानुयूगे  दबलेला आवाज मोकळा झाला आणि सर्व जाती धर्मातील लोक लिहू लागले. त्यांना नामदेव महाराज प्रोत्साहन देऊ लागले. त्यामुळेच नामदेव महाराज यांच्या काळात 24 स्री-पुरुष संत कवी निर्माण झाले. त्यांनी अभंग रचना केली. विशेषत: यातील बहुतेक  चातुर्वण व्यवस्थेने शुद्र, अतिशूद्र ठरविलेल्या विविध जातीतील होते.

ज्यात आमुचि माळीयाचि जात l

शेत लावू बागायतll

म्हणणारे सावता महाराज होते.

वारीक वारीक l

हजामत करू आम्ही बरीक l

म्हणारे सेना महाराज होते.

मन बुद्धीची कातरी l

राम नामे सोने चोरी l

म्हणारे नरहरी महाराज होते.

जोहार मायबाप जोहार l

तुमच्या म्हाराचा मी म्हारll

म्हणारे चोखोबा आणि त्यांचे कुटुंबीय होते. 

चोखामेळा आणि नामदेव महाराज यांचा तर एकमेकांशी खूप जिव्हाळा होता. म्हणूनच नामदेव महाराज यांनी आपल्या  कुटुंबातील सर्व सदस्यांना जशी अभंग लिहिण्यासाठी प्रेरणा दिली तशीच चोखोबा महाराज यांच्या कुटुंबातील सर्वांना लिहिते केले. ज्यात चोखोबांची पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहिण निर्मळा, मेहुणा बंका यांच्या नावे अभंग आहेत.

 ज्यांना व्यक्त होण्याचे कोणतेही माध्यम नव्हते. ज्यांच्या भावभावना हजारो वर्षे मुक्या झाल्या होत्या त्यांना आवाज मिळाला. आपली मते मांडता येऊ लागली, ही केवढी मोठी क्रांती होती.

अभंगाच्या माध्यमातून शुद्र, अतिशुद्रांना अभंगातून अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य वारकरी परंपरेतून मिळू लागले तेव्हा वर्चस्ववादी व्यवस्थेला हे सहन होणे शक्य नव्हते. गावकुसाबाहेर राहणारे चोखोबा, दासीचं काम करणारी जनाबाई  भगवंताचे अभंग लिहितात, या अभंगातून देवाशी सलगी करतात. आपल्या व्यथा वेदना मांडतात,  हे वर्चस्ववादी व्यवस्थेला पचने अवघड होते. म्हणूनच मग कधी जनाबाईवर भगवंताचा शेला चोरल्याचा तर कधी चोखोबांवर पाडुरंगाचा हार  चोरल्याचा आळ घेऊन मारहाण करण्यात आली. चोखोबांना मारहाण होतहोती तेव्हा त्यांनी विठ्ठलाचा धावा केला. 

धाव घाली विठू आता चालू नको मंद l

बडवे मज मारिती काय ऐसा अपराध ll

विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला l

शिव्या देती म्हणती म्हारा देव बाटविला ll

चोखोबा यांना झालेल्या मारहाणीमुळे सर्व कुटुंबियांना खूप दु:ख झाले होते. पण त्याचा खोलवर परिणाम त्यांचा मुलगा कर्ममेळा यांच्यावर झाला. मग अस्पृश्य म्हणून समाजात मिळणारी हीन वागणूक , अपमान हे कर्ममेळा अनुभवत होते. त्या वेदना त्यांना अस्वस्थ करीत होत्या. कर्ममेळा यांनी या अस्वस्थतेला आपल्या अभंगातून वाट करून दिली. चोखोबा यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या अभंगात अस्पृश्य जातीत जन्मल्याची खंत आहे.  पण कर्ममेळा यांच्या अभंगात विद्रोह आहे. हीन जातीत जन्माला घालून आपल्यावर देवाने अन्याय केले आहे, या भावनेतून कर्ममेळा संतप्त होतात. आपल्याला हीन जातीत जन्माला घातल्या बद्दल देवालाच जाब विचारतात.

देवा तू या संपूर्ण जगाचा निर्माता आहे , असे म्हणतात. निर्माता म्हणजे बाप. तू  जर सर्वांचा बाप  आहेस तर मग  असा पक्षपाती कसा वागतो. तुझी काही लेकरे तुझ्या जवळ येऊन तुझी पूजा करू शकतात, आम्हाला मात्र मंदिरात प्रवेश नाही. तुझी काही लेकर गावात महालात राहतात मात्र आम्हाला गावकुसाबाहेर झोपडीत का रहावे लागते? तुझी काही लेकर चांगले अन्न खातात आणि आम्हाला मात्र उष्ट्यावर  जगावे लागते. असे का? असे प्रश्न कर्ममेळा देवाला विचारतात. एवढे करून थांबत नाही तर देवाची लाज काढतात.

कर्ममेळा लिहितात-

आमुचि केली हीन याती l

तुज ना कळे श्रीपती ll

जन्म गेला उष्टे खाता l

लाज न ये तुझ्या चित्ता ll

आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच सातशे वर्षांपूर्वी कर्ममेळा देवालाही थेट सवाल करू शकले.

वारकरी भक्ती परंपरा विकसित होत गेली तशी एकट्याने केली जाणारी वारी सामोहीकरीत्या केली जाऊ लागली. कालानुरूप त्यात बदल होत गेले. ते आजच्या वारीच्या रूपात दिसत आहे. ज्यात सामाजिक समतेचे देखणे रूप पहायला मिळते.

 ✍️ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर

संपर्क: 9892673047

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !