MB NEWS:DIGITAL PAGE-दिवाळी सण - एक आध्यात्मिक संदेश
आपणा सर्वांना दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा!
लाख दिव्यांच्या उधळत ज्योती, आली ही दिवाळी,
ती येता सार्यांच्याच मनास हर्ष होतो भारी...
फराळ, फटाके, कपड्यांचा थाटच असे वेगळा,
कंदिल, पणत्या, रोषणाईचा रंगच असे न्यारा...
MB NEWS DIGITAL PAGE च्या सोबतीने साजरा करु हा आनंद सोहळा...!
अश्विन महिन्याची चाहूल लागली की आपल्याला दिपोत्सव साजरा करण्याचे वेध लागतात. दिवाळीत आवलेल्या पणत्या, दिव्यांची रोषणाई आणि आनंदी वातावरण यांनी आपल्या मनातील आणि बाहेरचा अंधार दूर होतो आणि आपले आयुष्य प्रकाशमय होतं. घरातील साफसफाई, आकाशकंदिल बनवणे, दिवे रंगवणे, रांगोळी काढणे, फराळ बनवणे हे तर आपण करतोच, पण दिवाळीची खरी रंगत वाढते ती या दरम्यान येणा-या दिवाळी अंकांमुळे. वेगवेगळ्या विषयांवरचे प्रतिभावान लेखकांचे लेख, कथा, कविता आणि मनोरंजक माहिती यांनी दिवाळी अंक भरगच्च भरलेला असतो.नव्या संकल्पनेतील डिजीटल दिवाळी विशेष पेज देण्याचा हा प्रयत्न आहे. हा उपक्रम आपणांस नक्कीच आवडेल हीच अपेक्षा..... आपल्या प्रतिक्रीया नक्की कळवा.
- संपादक, एमबी न्युज.
----------------------------------------
_____________________
■ दिवाळीबाबत दाते पंचांगकर्ते यांची माहिती
यावर्षी शास्त्रीयदृष्टया दिवाळी दोनच दिवस -दाते पंचांगकर्ते
वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. याचे कारण नरक चतुर्दशी ते कार्तिक शु. प्रतिपदा या तीन दिवसांत जनतेने मौज मजा करावी, गोडधोड खावे, आनंदी वातावरणात रहावे अशी बळीराजाची इच्छा आणि त्याला मिळालेला वर यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. यावर्षी वसुबारस 21 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिककडील काही प्रदेशांत धनत्रयोदशी 22 ऑक्टोबर रोजी शनिवारी आहे तर सोलापूर, औरंगाबाद, मराठवाडा आणि विदर्भाकडील काही प्रदेशांत 23 ऑक्टोबर रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे. (धनत्रयोदशी विषयी सविस्तर खुलासा दाते पंचांगात पान ८९ वर दिलेला आहे.) नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबर रोजी सोमवारी एका दिवशी आलेले आहे. 25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असून हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. ग्रहणाचे दुसरे दिवशी 26 ऑक्टोबर रोजी बुधवारी दिवाळी पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी आहे.
वसुबारस (21 ऑक्टोबर 2022, शुक्रवार)
या दिवशी सौभाग्यवती स्त्रीया एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे खालील श्लोक म्हणून सूर्यास्तानंतर पूजन करतात.
ततः सर्वमये देवि सर्व देवैरलंकृते । मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनी ।। अर्थ - हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.
या दिवशी दूध, दूधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. आज शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाई उपलब्ध नसतात अशावेळेस गाय वासराच्या मूर्तिची देखील पूजा करता येते. ते ही शक्य नसल्यास गाईच्या चित्राची पूजा करता येते. मात्र अशा वेळेस गाईच्या गोग्रासाकरिता म्हणून आपल्या भागातील गोशाळेस शक्य ते सहकार्य करावे.
धनत्रयोदशी, यमदीपदान (22 / 23 ऑक्टोबर 2022, शनिवारी / रविवार)
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील
अलंकार, सोने-नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यु म्हणजेच अकाली, अपघाताने मृत्यु येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा व घरातील प्रत्येकाने खालील श्लोक म्हणून दिव्यास नमस्कार करावा.
मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।
धनत्रयोदशी दोन दिवस खुलासा- दि. 22 ऑक्टोबर 2022 रोजी शनिवारी द्वादशी समाप्ति सायं. ६:०३ आहे. सायंकाळी ६:०३ नंतर सूर्यास्त होत असलेल्या गांवी दि. 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे तर काही प्रदेशात दि. 23 ऑक्टोबर 2022 रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे.
दि. 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली कांही प्रमुख गांवे मुंबई, ठाणे, पुणे, नासिक, सांगली, सातारा, कोल्हापूरसह संपूर्ण कोंकण, गोवा, गोधा सोडून संपूर्ण गुजरात, कर्नाटकातील बेळगांव, शिरसी, उडपी, मंगळूर या प्रदेशात दि.. 22 ऑक्टोबर रोजी शनिवारी धनत्रयोदशी करावी.
----------------------------------------
----------------------------------------
दि. 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली कांही प्रमुख गांवे सोलापूर, नागपूरसह अकोला, अमरावती, अहमदनगर, इंदापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगांव, जालना, धुळे, नांदेड, परभणी, भुसावळ, यवतमाळ, लातूर, वर्धा कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बिदर, अथणी, हुबळी, धारवाड, बेंगळूर, म्हैसूर संपूर्ण तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, जैसलमेर सोडून संपूर्ण राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब या प्रदेशात दि. 23 ऑक्टोबर रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे. (अधिक माहिती पंचांगात पहावी.)
_____________________
_____________________
नरक चतुर्दशी (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)
नरकासुराने 16 हजार 108 स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रीयांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये, म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे. पूर्वपिक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यु निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे. अपमृत्यु येऊ नये म्हणून यमाला खालील 14 नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करण्यास सांगितले आहे. वडील हयात असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व नसलेल्यांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी तर्पण करावे. 1) यम 2) धर्मराज 3) मृत्यु 4) अंतक 5) वैवस्वत 6) काल 7) सर्वभूतक्षयकर 8 ) औदुंबर 9) दक्ष 10 ) नील 11) परमेष्ठिन 12) वृकोदर 13) चित्र 14) चित्रगुप्त
लक्ष्मीकुबेर पूजन (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)
शेतकऱ्यांसाठी मागर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ति, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.
नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् ।।
अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच ।
भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥
अशी कुबेराची प्रार्थना करावी. यापूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.
लक्ष्मीपूजन मुहूर्त (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)
दुपारी ३:०० ते सायं. ६:००, सायं. ६:०० ते रात्री ८:३०, रात्री १०:३० ते रात्री १२:००
खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त) (25 ऑक्टोबर 2022, मंगळवार)
हे सूर्यग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे म्हणजे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्तास जाईल, त्यामुळे भारतात कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही. म्हणून आपल्या गावाच्या स्पर्शकालापासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा.ग्रहणाचा वेध हे ग्रहण दिवसाच्या चौथ्या प्रहरात लागत असल्याने मंगळवारच्या पहाटे ३:३० पासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी १२:३० पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ. करता येतील, तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात (मुंबईकरिता दुपारी ४:४९ ते सायंकाळी ६:०८) पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत. (आपल्या गावच्या ग्रहणस्पर्श व मोक्ष वेळा पंचांगात पहाव्यात)
या ग्रहणाचे वेध मंगळवारी पहाटे पासून असल्याने सोमवारी परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजन करून प्रसाद घेण्यास अडचण नाही.तसेच मंगळवारी सूर्यास्तानंतर वेध संपत असल्याने बुधवारी पहाटे दिवाळी पाडव्यानिमित्त केले जाणारे वहीपूजन देखील
परंपरेप्रमाणे करता येईल. पाडव्यानिमित्त केले जाणारे सर्व धार्मिक उत्सव परंपरेप्रमाणे करता येतील. (अधिक माहिती पंचांगात पहावी.)
यापूर्वी 1995 मध्ये याच प्रमाणे 23 ऑक्टोबर रोजी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन होते, 24 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होते. 25 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा आणि भाऊबीज आलेली होती. या नंतर 3 नोव्हेंबर 2032 मध्ये याच प्रमाणे दिवाळीमध्ये ग्रहण येणार आहे मात्र हे ग्रहण महाराष्ट्रातून दिसणार नाही, उत्तर भारतामध्ये दिसेल.
_____________________
_____________________
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) (26 ऑक्टोबर 2022, बुधवार)
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते..
या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते.
वहीपूजन मुहूर्त (26 ऑक्टोबर 2022, बुधवार) पहाटे ३:३० ते ६:३०, सकाळी ६:३० ते ९:३०, सकाळी ११:०० ते १२:३०
यमद्वितीया (भाऊबीज) - (26 ऑक्टोबर 2022, बुधवार)
नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे.
दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.
वर्षभरातील इतर सण उत्सव यांचे प्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे असते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धति जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात कुटुंबात एकोपा राखला जातो..प्रत्येक धर्मीयांच्या सण उत्सवामुळे संपूर्ण भारतात खरेदी विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते अर्थातच त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होऊन भारताची प्रगति होण्यात या सण उत्सवांचे मोठे सहकार्य लाभते ही गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे.
● दाते पंचांगकर्ते, सोलापूर
_______________________________
_______________________________
● परळीत स्थायिक झालेली - इटालियन कुळातील - सर्वांना आपली वाटणारी- "चिमणी" ऐन पन्नाशीत उडाली भुर्रऽऽऽ
परळी वैजनाथ /प्रा.रविंद्र जोशी.....
इटालियन तंत्रज्ञानाचा वापर करून हे जुने विद्युत केंद्र बनवण्यात आले होते. त्याचाच सगळ्यात दर्शनीय भाग म्हणजे ही चिमणी होती जी आज इतिहास जमा झाली आहे.कोळशापासून विद्युत निर्मिती करणारा मराठवाड्यातील एकमेव प्रकल्प असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन नंबरची चिमणी आता जमीनदोस्त करण्यात आली आहे.
प्रत्येक शहराची ओळख एक वेगळ्या वास्तूने होत असते तशी परळीची ओळख ही थर्मल पॉवर स्टेशनमुळे नक्कीच वेगळी आहे. हे थर्मल पावर स्टेशन जरी बंदिस्त असले तरी या थर्मल पॉवर स्टेशनमधून निघणारा जो काही धूर आहे तो बाहेर सोडण्यासाठी उंच मनोऱ्यासारख्या उभ्या असलेल्या या चिमण्या लोकांचं लक्ष वेधून घेत होत्या. या चिमण्यांपैकी एक असलेली जुनी चिमणी आता इतिहास जमा झाली.
मागच्या काही दिवसापासूनच कालावधी संपलेल्या संचातील साधन सामग्री बाजूला करण्याचे काम चालू आहे. यातच ही चिमणी पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये संच क्रमांक तीन पूर्णतः अवसायनात काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील सर्व मशिनरी यंत्रणा व या संचाच्या संबंधित सर्व विभाग हे एक एक करून नाहीसे करण्यात येत आहेत. आज शेवटच्या टप्प्यात संच क्रमांक तीनची धुरवाहक चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन एप्रिल 1979 मध्ये सुरू करण्यात आला होता.
2010 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक 3 चे आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हा संच स्क्रॅप मध्ये काढला आहे. आयुर्मान संपल्याने 2015 पासून हा संच बंद ठेवण्यात आला होता त्यानंतर सन 2019 पूर्वी हा संच स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला यापूर्वी महाजनकोने परळी औष्णिक उद्योग केंद्रातील 30 मेगावॅटचे दोन संच स्क्रॅपमध्ये काढलेले आहेत. विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन चार पाच हे तीन संच 2019 पासून बंद आहेत. त्यापैकी संच क्रमांक तीनची 120 मिटर उंचीची चिमणी आज सकाळी पाडण्यात आली आहे.
परळीत स्थायिक झालेली - इटालियन कुळातील - सर्वांना आपली वाटणारी- "चिमणी" ऐन पन्नाशीत भुर्रऽऽऽ उडाली. परंतु यातूनही तमाम परळी व परिसरातील नागरिकांची संवेदनशील भावना या चिमनी सोबत असल्याचे क्रिया प्रतिक्रिया करून दिसून आले ही चिमणी यापुढे दिसणार नसली तरी आजपर्यंतच्या पिढ्यांसाठी हा एक मोठा आठवणीचा ठेवा असणार आहे.
-------------------------------------------------
|अभिनय:एक अवलोकन |
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
■ दिवाळी सण - एक आध्यात्मिक संदेश
गुरुदेव श्री आशुतोष महाराजजी (संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान)
सूर्योदयापासून सुरू होणारा प्रत्येक दिवस मानवी सभ्यतेच्या महान गाथेतील एक सुवर्ण अध्याय म्हणून येतो. पण काही दिवस आपल्यातच इतके महत्त्वाचे संदेश घेऊन येतात की मानव समाज त्यांना युगानुयुगे विसरू शकत नाही. असे अविस्मरणीय दिवस सण किंवा उत्सव म्हणून साजरे केले जातात. विशेषत: सणांच्या संदर्भात भारत हा सर्वात समृद्ध देश आहे. सण हे भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत. ते जीवनावश्यक आणि पौष्टिक आहेत. कारण भारतीय सणांमध्ये ती ऊर्जा आहे, ज्यामध्ये कर्मकांडापासून वंचित राहिलेल्या मानव जातीला पुन्हा जिवंत करण्याची क्षमता ठेवते.
कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जाणारा 'दीपावली उत्सव'या सांस्कृतिक उत्सवांच्या मालिकेत, मुकुटमणी स्थानावर आहे. या उत्सवाच्या नावावरूनच त्याचे तेज आणि दिव्यता दिसून येते. 'दीप' म्हणजे दिवा, 'अवली' म्हणजे पंक्ती. म्हणजेच दिव्यांची पंक्ती. या सणाच्या दिवशी, लखलखणारे दिवे एकच संदेश देतात – तुमच्या अंतरंगातील तमोगुण दूर करा. मिणमिणते दिवे आपल्याला अंतर्मनात ईश्वर-ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्यास सांगतात, अमावस्या कितीही अंधारलेली असो, अंतरंगात आमच्यासारखे प्रकाशमान व्हा.
हा उत्सव भव्यतेचा उत्सव नाही. तो महान संदेशांचा वाहक आहे. दीपावली साजरी करण्यामागचे सर्वात लोकप्रिय कारण पाहिल्यास, आपल्या लक्षात येईल की हा मुख्यतः श्री राम-सीता अयोध्येत परतल्याचा आनंदाचा उत्सव आहे. त्रेतायुगातील हा संपूर्ण प्रसंग एक अलौकिक संदेश देऊन जातो. अध्यात्मिक दृष्टिकोनानुसार सीता हे आत्म्याचे प्रतीक आहे. मनाच्या रूपात रावणाचे शरीर म्हणून तो लंकेत कैद आहे. मनातील इच्छा आणि विकार हे आसुरी शक्तींचे प्रतीक आहेत. नाना प्रकारच्या यातना आणि प्रलोभने देऊन ते आत्म्याला सतत त्रास देत आहेत. अशा स्थितीत श्री हनुमान रामदूत म्हणून अशोक वाटिकेत पोहोचले, अशी महती आहे. हरणाच्या वेळी रावणाचा ऋषी वेश पाहून सीताजींची एकदा फसवणूक झाली होती. त्यामुळेच यावेळी त्यांचा हनुमानजींवर विश्वास बसला नाही. त्यांनी रामदूत असल्याचा पुरावा मागितला. हनुमानजींनी त्यांच्यासमोर भगवान श्रीरामाची मुहर पुरावा म्हणून मांडली. या रिंगणात सीताजींना रामाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. हे पाहूनच त्यांनी हनुमानजींना रामाचे दूत म्हणून स्वीकारले. परमेश्वराच्या अलौकिक दर्शनाने निराश झालेल्या सीतेच्या मनात अढळ विश्वास निर्माण केला की तिला लवकरच परमेश्वराच्या भेटीचा आनंद मिळेल. हीच श्रद्धा, हे आश्वासन प्रत्येक युगात, प्रत्येक जीवाला स्वतःसाठी हवे असते. रामदूत हनुमान हे परिपूर्ण सतगुरूचे प्रतीक आहे. आपल्या आत्म्यालाही अशा सत्गुरूची नितांत गरज आहे, जेणेकरून मनाच्या रूपाने रावणाच्या राजवटीतून मुक्त व्हावे.
ही कथा आणखी एका महत्त्वाच्या सत्यावर प्रकाश टाकते. सध्या सर्वत्र भगवे कपडे घातलेले प्रचारक दिसत आहेत. अशा स्थितीत सीताजींप्रमाणेच प्रत्येक साधकाला आपल्या सिद्धतेचा पुरावा त्यांच्याकडून मागावा लागतो. जे परिपूर्ण गुरू आहेत, ते ब्रह्मज्ञानाचा शिक्का पुरावा म्हणून देतील. या ज्ञानाद्वारे शिष्याला त्याच्या आत असलेल्या परम प्रकाशाचे (श्री राम) प्रत्यक्ष दर्शन होईल. किंबहुना हाच गुरूंच्या सत्यनिष्ठेचा पुरावा आहे. मग ज्याप्रमाणे सीताजींना आपल्या मुक्तीची पूर्ण खात्री झाली होती, त्याचप्रमाणे खर्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिष्याला पूर्ण खात्री होते. त्याच्याकडून भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर तोही मुक्तीच्या मार्गावर पूर्ण श्रद्धेने आणि भगवंताशी एकरूप होऊन पुढे जातो आणि निःसंशयपणे गंतव्यस्थान प्राप्त करतो. परिपूर्ण सतगुरूच्या सान्निध्यात, शिष्य स्वतःमध्ये अलौकिक दीपावली साजरी करतो. सत्गुरूंच्या कृपेने त्यांचे हृदय दिव्य दिव्यांनी, असंख्य दीपशिखांनी आणि सोनेरी प्रकाशाने भरलेले असते आणि हेच या प्रकाशोत्सवाचे सार्थक रूप आहे. दिव्य ज्योती जागृति संस्थेतर्फे सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
संकलन: संतोष जुजगर, परळी वैजनाथ.
------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा