भगर खाण्यापूर्वी काळजी घ्या:जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन 

बीड, दिनांक 05 (जिमाका) : श्रावण मास, एकादशी, महाशिवरात्री, नवरात्र, आषाढी एकादशी आदी उपवासाच्या काळात ‘भगर'चे (सामा, वरई) सेवन मोठ्या प्रमाणावर होते. भगर पचायला हलकी, उपयुक्त आहे. परंतु अलीकडील काळात काही ठिकाणी भगर खाल्ल्यानंतर विषबाधेचे प्रकार घडलेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी भगरचे सेवन करताना योग्य काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे. 



परवाना प्राप्त व विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच भगर खरेदी करावी. ती स्वच्छ, कोरडी, गंधविरहित आणि बुरशीमुक्त असावी. खराब, काळसर किंवा बुरशी लागलेली विकत घेऊ नये. बाजारात कमी दरात मिळणाऱ्या पॉलिश केलेल्या,  प्लास्टिकसदृश चमकदार भगरपासून दूर राहावे. एफएसएसएआय (FSSAI) प्रमाणपत्र असलेलीच भगर खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. भगर शिजवण्यापूर्वी किमान 2-3 वेळा स्वच्छ पाण्यात धुवावी. शक्य असल्यास 30 मिनिटांपर्यंत पाण्यात भिजवावी. स्वयंपाक करताना स्वच्छ, उकळलेले पाणी, भांडी वापरावीत. योग्य तापमानावर भगर पूर्णपणे शिजेपर्यंत उकळावी.


शिजवलेली भगर साठवताना, खाण्यापूर्वी खूप वेळ उघड्यावर किंवा खोलीच्या तापमानावर ठेवू नये. अन्न साठवताना ते झाकून ठेवावे, फ्रिजमध्ये ठेवणे अधिक सुरक्षित राहील. उरलेली भगर पुन्हा गरम करताना नीट उकळावी. थंड झालेली भगर तशीच खाणे टाळावे. 


भगर खाल्ल्यानंतर मळमळ, उलटी, पोटात दुखणे, डोके दुखणे, थकवा, ताप, चक्कर येणे, श्वास घेण्यात अडचण अशा वेळी तत्काळ नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल व्हावे. उशीर करणे जीवघेणे ठरू शकते.


भगर शिजवताना वैयक्तिक स्वच्छता राखावी. घरगुती भगर ऐवजी औद्योगिकरित्या उत्पादन केलेल्या भगरचे सुरक्षितपणे सेवन करावे. भगरवर कोणतेही रासायनिक प्रिझर्वेटिव्ह असल्यास ती खाणे टाळावी.


आरोग्याशी कोणतीही तडजोड करू नये. योग्य ती काळजी  घेतल्यास विषबाधा टाळणे शक्य होते. जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूचना नागरिकांनी गांभीर्याने घेत खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही स्वामी यांनी केल्यात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !