● वाचा ✍️ सौ. अपर्णा हृषिकेश नेरलकर, नांदेड यांचा विशेष ब्लॉग>>>> आमचे कल्पवृक्ष : स्वर्गीय अंबादास देशपांडे
आमचे कल्पवृक्ष : स्वर्गीय अंबादास देशपांडे
.....................................................
माझे बाबा म्हणजे वडील स्व. अंबादास गंगाधरराव देशपांडे यांना दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी देवाज्ञा झाली. कौटुंबिक सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडून तृप्त मनाने त्यांनी आम्हा सर्व परळीकर देशपांडे व नेरलकर, स्नेही परिवारांचा निरोप घेतला. देहरुपाने बाबा आज जरी आमच्यात नसले तरी त्यांनी आम्हा चौघी बहिणीवर जे संस्कार केले,जो सकारात्मक दृष्टिकोन दिला व नैतिक मूल्यांची शिकवण दिली हे आजही मला प्राजक्तांच्या फुलांप्रमाणे सुगंधीत वाटतात. अनेक वर्षे मला माझ्या बाबांना जवळून पाहता आले. त्यांच्या प्रत्येक पावलांना अवलोकनाची संधी मला मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. मनाचा प्रचंड गोंधळ, सुरुवात त्यांच्या कोणत्या क्षणापासून करावी ज्यामुळे लय प्राप्त होईल. आपणासमोर सुव्यवस्थितपणे त्यांचे व्यक्तिमत्व साकार होईल याच विचाराने लेखणाला सुरुवात केली. त्यांचे अनैक पैलू डोळ्यांसमोरून तरळून जात होते. त्यांचे वाचन चौफेर व समृद्ध होते. आपल्या अवतीभवती काय घडत आहे याविषयीची त्यांना नेहमी जिज्ञासा असे. सामाजिक व राजकीय स्थितीबाबत त्यांचे विश्लेषण व मते अभ्यासपूर्ण असायची.
...................
माझ्या बाबांचे वडील म्हणजे आजोबा कै. गंगाधरराव देशपांडे स्वातंत्र्यसैनिक होते. बाबांचे अनेक निर्णय - मुलगा- मुलगी हा भेद न मानणारे, शिक्षणासाठी उत्सुक असलेले माझे बाबा, नातेसंबंध जपताना वडिलधार्यांचा आदेश शिरसावंद्य म्हणून असेल किंवा आजोबांना अवेळी आलेल्या देवाज्ञाने असेल.... कर्तव्यश्रेष्ठतेपुढे स्वतःची मतं, स्वतःच्या इच्छा यांना दुय्यम स्थान देण्याची त्यांची वृत्ती - एकतत्व कार्यप्रणालीसाठी गतीशील ठरत होते.
ज्या गोष्टी आपले विधीलिखित आहे त्या गोष्टींना आपण कोणीच टाळू शकत नाही. चाळीस वर्षांपूर्वी समाजामध्ये वंशाला दिवा असणे खूप महत्त्वाचे समजले जात होते. नाही म्हटलं तरी “आपल्या वंशाचा दिवा ‘मुलगाच’.... एकतरी मुलगा हवाच घरात वंशाचा वटवृक्ष वाढवायला....” अशा एक ना अनेक विधानांनी तद्कालीन स्त्रियांना वेदनेच्या खाईत लोटणारी, त्यांना दुय्यम स्थान देणारी समाजव्यवस्था होती. या समाजव्यवस्थेच्या विरोधात बाबांनी त्या काळात पुकारलेले बंड याची खूप मोठी किंमत आम्हाला आज वाटते. त्यांनी त्या काळामध्ये दाखवलेले धारिष्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचे वाटते. त्यावेळी कुटुंबात निर्माण झालेली परिस्थिती याबद्दल आई, आजीकडून वारंवार ऐकले.
“सुखदा आणि वनश्री (माझ्या छोट्या बहीणी) या झाल्याच नसत्या कारण अर्चना (माझी मोठी बहीण) अन् तू (अपर्णा) झाल्या तेव्हाच तुझ्या बाबांनी सर्वांना सांगितलं मला या दोन्ही नंतर तिसरे मूल नको.”
बाबांना घरचे आणि बाहेरचे सगळे समजावून सांगायचे,
“अरे, होईल मुलगा आणखी एखादा प्रयत्न कर, नाही तर दुसरे लग्न कर....”
बाबा सगळ्यांना ठणकावून सांगायचे,
“माझ्या चारही मुलींना मला मुलांसारखे संस्कारित करायचे आहे आणि त्यांचे नवरे माझे चारही जावई माझे मुलंच होतील ना! ह्या मुलीच वाढवतील आमचा वंशवटवृक्ष!”
पण माझी आजी आदेशापुढे आणि आईच्या इच्छेखातर त्यांनी आम्ही चौघी मुली... अर्चना, अपर्णा, सुखदा आणि वनश्री !
सुखदा, वनश्रीनंतर मात्र आई, आजीही हतबल झाल्या, दुसर्या विवाहाचा सल्लाही बाबांनी दूर ठेवला आणि आम्ही चौघींना शिक्षीत, सुसंस्करित आणि आत्मनिर्भर, विवेकी बनवलं. त्यामुळे आम्ही चौघीही आपल्या पायांवर उभ्या असून चौघींनाही घर चांगले मिळवून दिले. चारही जावई त्यांची त्यांच्या मुलांप्रमाणे काळजी घेतली, असा बाबांचा मोठा परिवार झाला चार मुले, चार मुली.आजोबांना खूप लवकर देवाज्ञा झाली म्हणून इच्छा असूनही बाबांना जास्त शिक्षण घेता आले नाही. घरच्या सगळ्या जबाबदार्या सांभाळता सांभाळता त्यांनी वडिलोपार्जित शेती सांभाळायची ठरवले.
आमचं राहणीमान, वागणं, बोलणं, शिक्षण या सगळ्यांमध्ये बाबांचा खूप मोठा सहभाग होता, अजूनही आहे. मुली म्हणून त्यांनी आमच्यावर कधीच कुठले बंधन घातले नाहीत, पण मोकळीक देत असताना सतत मर्यादांची जाणीव मात्र ते करून द्यायचे अगदी सहज. ते नेहमी सांगत संकटं आले की अजिबात डगमगायचे नाही जे होत राहतं ते सगळं आपल्या चांगल्यासाठीच यातून हसून खेळून पुढे जायचे. ईश्वराने त्यापेक्षा अजून काहीतरी चांगले लिहून ठेवलेले असते आपल्यासाठी आणि ते खरेच होते.
प्रचंड प्रेमळ, शांत आणि हसतमुख असणारे आमचे बाबा येणार्या प्रत्येक प्रसंगाला आपण कसे समोर गेले पाहिजे आणि त्यातून बाहेर कसे पडले पाहिजे हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून शिकवले. आईसारखं त्यांना दाखवता नाही आलं तरी त्यांचा आमच्यावरचा प्रचंड वात्सल्याविष्कार आम्ही अनुभवत आहोत. आमच्या प्रत्येक सुख-दुख:त ते अगदी खंबीरपणे आमची पाठराखण करायचे . आज आमचे हे छत्र व हक्काचा आधार दूर निघून गेला आहे.
‘कष्ट केल्याने कुणी मरत नाहीच मुळी असं’ ते शेतकरी असल्याने परिस्थितीशी आणि निसर्गाशी तडजोड करण्याची कला त्यांना चांगलीच अवगत झाली आणि ते त्यात रमलेही. ऊन-पाऊस-वारा यांची पर्वा न करता खूप कष्ट करून ते संसाराचा गाडा हाकायचे. शेतात बैल नाही आले तर सालगड्याला हाताशी घेऊन स्वत: शेत नांगरलेले आम्ही त्यांना पाहिले आहे. त्यांना श्रमाच्या मूल्यांची प्रतिष्ठा त्या काळात सुद्धा महत्त्वाची वाटायची. आखाड्यावर अडकवलेल्या डब्यांच्या पिशवीत हात घातला तर कितीदातरी त्यातून साप निघायचे बाबांकडे काळी राजदूत गाडी होती. कितीदा तरी गाडीच्या डिक्कीत साप बसलेले असायचे. बाबांनी अक्षरश: काबाडकष्ट ज्याला आपण ढोर मेहनत म्हणू ती त्यांनी केली. शेती करत असताना अनेक नवनवीन प्रयोग केले. परळी गंगाखेड परिसरामध्ये ते प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जायचे.
मला आठवतं, मी साधारण पंधरा-सोळा वर्षांची असेल बाबांनी स्वत:जवळची सगळी कमाई घालून द्राक्षाचा मळा अतिशय सुंदर मेनटेन केला. 2 वर्षे इतकं छान उत्पन्न निघाले, पण पुढील 3 वर्षे सतत पाऊस झालाच नाही. सगळ्या विहिरी आटल्या, बोर आटले, अन् द्राक्षाचा मळाच काय? सोयाबीन, आंबे, भाजीपाला, चारा सगळं-सगळं वाळून गेलं. त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या हिरव्या शालीला जळताना ते पहात होते. त्यांना निसर्गाने इथेही साथ नाही दिली. हा धक्का बाबांसाठी एवढा मोठा होता की, त्यांना यातून बाहेर पडायला तब्बल दोन-तीन वर्षे लागले. पण पुन्हा शेती करण्याची त्यांची हतबलता पुढे आले. त्यांनी शेती विकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विकलीही. मग लोक त्यांना सल्ला देऊ लागले,
“आलेले पैसे व्याजाने दे, खूप पैसा मिळतो त्यात.”
‘आयुष्याच्या खेळात हार आली तरी बेहत्तर पण सत्याच्या नियम मोडायचा नाही’ हे ब्रीद घेऊन चालणारे बाबा. त्यांना इतरांचे पळपुटे सल्ले अजिबात आवडत नसत. ते म्हणायचे,
“माझ्या मुलींसाठी मला सगळ्यांचे चांगले आशीर्वाद घ्यायचेत. व्याज देणारा सुखासुखी देत नाही... अनंत यातना होतात त्यालाही. कुणाची गरज म्हणून का त्याची अवहेलना करायची.”
त्यांना एकही शत्रू नाही, पण मित्र फारसे उरले नाहीत.
पण थकतील ते बाबा कसले, त्यांनी आपल्या जगण्याची दिशा पुन्हा बदलली. त्यांचा आवडता छंद वाचन आणि भ्रमंती. मला अजूनही आठवते ते दर महिन्याला नकाशा काढून बसायचे. पूर्ण नकाशा त्यांना मुखपाठ होते. आत्तापर्यंत त्यांनी जवळपास दहा ते अकरा हजार पुस्तके वाचले असतील. त्यात ऐतिहासिक, माहिती देणारे, अनुभवकथन करणारे, प्रवासवर्णन, समाजप्रबोधनपर मोठ्या लेखकांच्या कादंबर्या, हास्यकथा, लघुकथा, बोधकथा, प्रेमकथा, भयकथा, रहस्यकथा, स्त्री विशेष कथा, कथांच्या मालिका, महान व्यक्तींचे जीवन चरित्र आणि अन्य कथांचे वाचन त्यांनी केले. भालचंद्र नेमाडे, चेतन भगत, रणजीत देसाई, राम गणेश गडकरी, वी. वा. शिरवाडकर, वि.स. खांडेकर, बाबा आमटे, माडगुळकर, अत्रे, डहाके, पु.ल. देशपांडे, कालिदास तसेच कार्ल मार्क्स, शेक्सपिअर यांचे अनेक इंग्लिश पुस्तकही त्यांच्या आकलनातून सुटू शकले नाहीत.
वाचनसमृद्धीमुळे की काय पण अकारण चिडचिड केलेली आम्ही त्यांना कधी पाहिलं नाही. आदर्श संस्कार! कॅरमचा खेळ असो, पत्त्यांचा गेम असो, गोट्यांचा असो की आंब्याच्या वाळलेल्या कोयींचा सगळ्या खेळात त्यांचे मार्गदर्शन अतिसुलभ आम्हाला मिळायचं.
हसत खेळतं नवीन आयुष्य सुरू होतं. पण म्हणतात ना... अडथळ्यांची रास पाचवीच्या पूजनावेळी मांडली जाते ते नियतीकडून.... अडथळ्यांच्या अनेक वेगवेगळ्या शर्यती पार करत समाधान मानून त्यांनी जणू प्रत्येक्ष क्षणाचा आनंदोत्सवच साजरा केला. निर्भेळ, निष्कलंक, निरागस आणि निष्कपटी असणारे आमचे बाबा आम्हा चार लेकींसाठी कल्पवृक्षच होते. आम्हा चौघा बहिणींच्या विवाहोत्तर आयुष्यामध्ये ज्या काही छोट्या अडचणी यायच्या, त्या आम्ही त्यांना बिनधास्त बोलून टाकायचं व ते आमच्या प्रत्येक अडचणीवर उपाय शोधायचे. ते आमचे वडील असले तरी त्यांच्याशी आमचे मैत्र पक्के जुळायचे. त्यामुळे आम्हाला आयुष्यामध्ये अडचणीच्या वेळी हमखास मार्गदर्शन करणारे बाबाच आमचे पाठीराखे असायचे.कितीही दु:ख आले तरी ते झेलण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडूनच मिळालेलं वरदानंच ठरतं.
मला अजून आठवतं बाबांची मावशी..... होती दर नवरात्रीमध्ये ती देवीच्या मंदिरात घरी बसण्यासाठी यायची. मी साधारण दहा वर्षांची असेल. त्या गोणीच्या पोत्यावर झोपायच्या. संध्याकाळी आम्हाला गोष्टी सांगायच्या. गोष्ट झाली की म्हणे,
“गोष्टीतला सावकार तुझ्या बापासारखाच चिकट होता.” मी त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ते पोतं खालून धरलं अन् फरफर ओढून ओसरीच्या दारापर्यंत नेलं अन् म्हणाले,
“झोप आता इथे डायरेक्ट मंदिरात दाराशी.”
तितक्यात बाबा नुकतेच शेताहून आले. बाबांची एक झापड कानाखाली दिली ते सगळ्या डोक्यात मुंग्याच मुंग्या... मला कळत नव्हते... मी बाबांच्या विरोधात बोलणार्या मावशीला शिक्षा दिली होती तरीही... मलाच! एरवी फणसाच्या गरीसारखे गोड वाटणारे बाबा, त्यादिवशी मात्र काटेरी आणि कठोर वाटले. ही अवस्था मात्र आयुष्यात आलेली ही वेळ; पण ती पहिली अन् शेवटची. इतरवेळी डोळ्यांच्या नजरेत त्यांचा धाक दिसायचा. बाबांनी काही गोष्टी आम्हाला शिकवल्या. त्यांचा आज वेळोवेळी उपयोग होतो. ‘माणसाने नेहमी पायी चालणार्यांकडे पहावे घोड्यावरून फिरणार्यांकडे नाही. जे आपल्याकडे आहे त्यात समाधान मानता आले पाहिजे म्हणजे आपण सुखी राहतो.’ ही विचारधारा घेऊन जगणार्या बाबांच्या या अत्यंत तरल जीवनस्थितीला पाहत मी वाढले म्हणून की काय आम्हा चार बहिणींमध्ये मी बाबांच्या बाबतीत अतिसंवेदनशील होत असते...
मी बाबांच्या वागण्याकडे माझे अतिसूक्ष्म लक्ष्य राहत होते. मावशी तरी व्यक्ती होती... पण बाबांचे जीवन वस्तू किंवा जनावरे यांचाही चुकूनही झालेला अवमान त्यांना सहन होत नव्हता.
माझ्या स्कॉलरशीपच्या परीक्षा काळ होता. अभ्यासात लक्ष्य असावे म्हणून बाबा आम्हाला शेतात घेऊन गेले होते. शांत वातावरणात व आपल्यासमोर अभ्यास होईल म्हणून... जाताना विहिरीच्या बाजूला पाईप पडला होता. बाबांनी त्याला उचललं आणि कठोर उद्गार निघाले -
“विहिरीतील पाईप किती उन्हात ठेवलेस, खराब होतील की”.
नारायण मामा सावरावर करीत होते,
“आत्ताच टाकले मालक...”
“पाईप हाता घेतला की मला कळतो रे, कधी काढला ते.”
जनावरांकडे दुर्लक्ष झाले की गडीमाणसावर ओरडायचे,
“अरे त्यांची काळजी घेतली की ते आपली काळजी घेतात...”
ते बोलत होते... मी माझ्या विचारात गर्क झाले होत. त्यांच्या प्रत्येक रागावण्यामागे आपली जडणघडण, जपणूक जाणवत होती. आणि मी मात्र त्यांच्या रागवण्यामागचे प्रगल्भ प्रेम अनुभवत होते.
मध्ये बराच कालखंड गेला...
माझ्या लग्नासाठीचा विचार घरात होऊ लागला. त्यावेळी माझ्याकडून अपसूक शब्द ओठाद्वारे बाहेर पडले,
“बाबा, तुमच्या एका मुलीने लग्न नाही केले तर चालत नाही का हो?”
त्यावेळी बाबा विस्मयचकित होऊन माझ्याकडे पाहात म्हणाले,
“तसं नसतं रे अप्या, मुलगी म्हणजे धन, आत्मजा दुजाचे, ज्याचे त्यास देणे.” त्यावेळी मला बाबांच्या डोळ्यातील ते औदार्य आणि माझ्याबद्दलची मी अवेळी मोठी झाल्याची भावना त्यांच्या कणाकणातून स्फुरलेली जाणवली. त्याच्या नजरेतील त्याची भावना अस्पष्ट शब्दरूपाने प्रगट झाली, “कॅप्टन...!” आणि मी मात्र निःशब्द झाले. तेव्हाच मी मनाशी पक्की खुणगाठ बांधली... बाबा माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक असेल. बाबांना कधीही फोन केला की पहिलं वाक्य कानावर यायचं, “बोला ‘कॅप्टन’ काय चाललंय. ?” बाबांनी कॅप्टन म्हणलं की एक अव्यक्त अतूट असणारा हळवा बंध जाणवायचा. जो मला माझ्या आयुष्याच्या प्रवासात निरंतर जमिनीवर राहून जबाबदारीची सदोदित जाणीव देणारा सोबती ठरतो.
‘सजन रे झुठ मत बोलो
खुदा के पास जाना है
न हाथी है न घोडा है
वहाँ पैदल ही जाना है...’
बाबांच्या आवडीच्या गाण्याला, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीने आम्हा चौघी बहिणींच्या समोर त्यांनी आदर्श निर्माण केलेला आहे. त्यांनी दिलेली जन्मभराची शिदोरी कधीही न संपणारी आहे. त्यांच्या अमीट आठवणी आजही डोळ्यासमोर येतात. त्यांच्या निधनामुळे आम्हा चारही बहिणींच्या आयुष्यामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे... ती कधीही भरून निघणारी नाही... बाबांचं नसणं... ही कल्पनाच करवत नाही.... ती वेदना, नेहमीच आम्हाला सतावणारी आहे....
✍️ सौ. अपर्णा हृषिकेश नेरलकर,नांदेड
---------------------------------------------------
●अधिक बातम्या वाचा व पहा●
-------------------------------------------------------
Click-■ *3 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील परळीत*
Click- ■ *परळी तालुक्यातही शेतात लागवड केलेल्या गांजावर छापा*
Click-■ *सरत्या आर्थिक वर्षात संस्थेस 46.37 लाखांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके*
Click:■ *ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट*
Click- ● *परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा*
Click-● *पिकांच्या नैसर्गिक नुकसानाबाबत तक्रारीसाठी विमा कंपनीकडे अशी करा तक्रार*
Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*
Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*
Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*
Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*
Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*
Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*
Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*
Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*
Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*
Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !
Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी
Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या
Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल
Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*
Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...
----------------------------------------------------
----------------------------------------------------
Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*
Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*
Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा