MB NEWS:पंढरपूर दुर्घटना:मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश(Reporter-Rameshwar Nanaware)
पंढरपूर दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
पंढरपुर, प्रतिनिधी....
पंढरपूरच्या कुंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी दिले. राज्यातील पूर परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. राज्याच्या कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे नुकसान झाले आहे. येथील नुकसानीची त्यांनी माहिती घेतली. हवामानखात्याने दिलेल्या इशाऱ्याची नोंद घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी, पोलिस व प्रशासनाने सतर्क रहावे, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हा व पोलिस प्रमुखांना दिल्या. अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे व बचाव, मदतकार्य तत्परतेने करण्याचे त्यांनी निर्देश दिले. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक वसाहतीत पाणी शिरल्याचा व झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत, त्याचीही गांभीर्याने दखल घेऊन मदतकार्य तातडीने सुरु करण्याचे निर्देश अजित पवार यांनी स्थानिक प्रशासनाला दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा