MB NEWS:*राज्यभरात थंडीची लाट; नागरिकांना हुडहुडी*
⭕⭕⭕
*राज्यभरात थंडीची लाट; नागरिकांना हुडहुडी*
मुंबई – राज्यात आता गुलाबी थंडीची लाट यायला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने तापमानात घट होईल, अशी शक्यता वर्तविली होती. त्यानुसार मुंबईत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये 19.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. तर आज बुधवारी मुंबईत 19.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच ईशान्य दिशेने वेगाने थंड वारे वाहतील. यामुळे रात्रीच्या तापमानात घट होईल तर गुरुवारपासून वाऱ्याची दिशा पुन्हा बदलण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली होती.
दरम्यान, आज राज्यात सर्वात कमी नोंद परभणीमध्ये झाली आहे. परभणी विद्यापीठ इथे किमान तापमान 8.0 अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. तर यवतमाळमध्ये 10.0 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच नाशिकचे तापमान 11.8 पर्यंत घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. त्याचबरोबर देशाच्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका चांगला गारठला आहे. त्यामुळे उब मिळवविण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे राज्यात ठिकठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे. परिणामी गारव्यामुळे नागरिकांचे मन प्रफुल्लित आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा