MB NEWS-सरकारने राज्यातील सर्व खाजगी रुग्णालये कोरोनासाठी अधिग्रहित करावीत - रानबा गायकवाड
सरकारने राज्यातील सर्व खाजगी रुग्णालये कोरोनासाठी अधिग्रहित करावीत - रानबा गायकवाड
परळी (प्रतिनिधी ) दुष्काळी परिस्थितीत जेंव्हा भीषण पाणीटंचाई निर्माण होते तेंव्हा राज्य सरकार गाव जिल्हा पातळीवरील सर्व विहीर अधिग्रहित करून जनतेला पिण्याचे पाणी पुरवठा करते. त्याच धर्तीवर सध्याची कोरोनाची भयाण परिस्थिती लक्षात घेऊन व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील सर्व खाजगी रुग्णालये किमान एक महिना अधिग्रहित करण्याची मागणी जेष्ठ पञकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात जाणवत आहे. रुगणसंख्या वाढत असल्याने सरकारी. महानगरपालिका, नगरपालिका यांच्या दवाखाने आणि कोविड सेंटरवर अतिरिक्त ताण आला आहे. शासकीय रुग्णालयात योग्य आणि कमी खर्चात रुग्णावर उपचार होत आहेत.
कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी, जनतेला योग्य शासकीय दरातच उपचार मिळावेत. बेडचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच रेमेडिसिवरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि खाजगी रुग्णालयात होणारी लाखो रुपयांची लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व खाजगी रुग्णालये एक महिना ताब्यात घ्यावीत.
सदर खाजगी रुग्णालयावर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत नियंत्रण ठेवावे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाची साथ आटोक्यात येण्यास मदत होईल असेही रानबा गायकवाड यांनी म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी बीड यांनाही देण्यात आल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा