MB NEWS-*राखेचे प्रदुषण करणाऱ्यांवर वेळीच आवर घाला- पंकजाताई मुंडे यांनी केली मागणी*
*राखेचे प्रदुषण करणाऱ्यांवर वेळीच आवर घाला- पंकजाताई मुंडे यांनी केली मागणी*
परळी । दिनांक१६।
एकीकडे कोरोनाचे गंभीर संकट आणि त्यातच राखेचे प्रचंड प्रमाणात होणारे प्रदूषण यामुळे तालुक्यातील दादाहरी वडगांवचे ग्रामस्थ हैराण झाले असून काल मध्यरात्री सर्वच गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून याविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन रास्ता रोको केला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना ही बाब समजताच त्यांनी मध्यरात्रीच ग्रामस्थांच्या बाजूने उभे रहात महसूल व पोलिस प्रशासनाला धारेवर धरले. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या राखेच्या ठेकेदारांना वेळीच आवरा अशी मागणी त्यांनी केली आहे.
औष्णिक वीज प्रकल्पातून बाहेर पडणारी राख मोठया प्रमाणात दादाहरी वडगांव परिसरात आणून टाकली जाते, याठिकाणी तळेच्या तळे साचलेले आहेत. तळ्यातील राखेची वाहतूक बंद असताना छोटे-मोठे ठेकेदार ती राख बेकायदेशीर पणे उचलतात, त्याची अवैध वाहतूक व साठवणूक करताना सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याने मोठया प्रमाणावर प्रदुषण होऊन लोकांच्या घरा घरात राख पसरत आहे, परिणामी त्यांना कोरोना बरोबरच वेगवेगळया आजारांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत गावचे सरपंच कुकर यांनी महसूल ,पोलिस व वीज प्रकल्पाला अनेक वेळा निवेदने देऊन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली परंतू प्रत्येक अधिकारी एकमेकांवर ढकलून मोकळे होत आहेत, त्यांचेवर कुठलीच कारवाई केली जात नाही.
*ग्रामस्थांसाठी पंकजाताई धावल्या*
------------------------------
राखेची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने वीजेच्या खांबाला धडक दिल्याने तारा तुटल्या परिणामी संपूर्ण गांव तीन दिवसांपासून अंधारात होते. अगोदरच कोरोना त्यात प्रचंड उकाडा, घरात अंधार आणि राखेचे प्रदुषण यामुळे ग्रामस्थ प्रचंड वैतागले. त्यांनी काल मध्यरात्रीच परळी- गंगाखेड रस्त्यावर आंदोलन सुरू केले. ही बाब पंकजाताई मुंडे यांना समजताच त्यांनी मध्यरात्री डीवायएसपी तसेच तहसीलदार यांना फोन लावला. त्यांच्या फोननंतर प्रशासन हलले आणि वीज पुरवठा सुरळीत झाला तसेच यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले.
*कठोर कारवाईची मागणी*
---------------------------
परळी व परिसरात राखेच्या प्रदुषणाच्या विषय गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मध्यंतरी राखेची वाहतूक बंद करण्यात आली होती परंतू ती पुन्हा चालू करण्यात आली आहे. प्रशासनाचे कसलेच नियंत्रण नसल्याने प्रचंड गैरव्यवहार व भ्रष्टाचार यात होत आहे, वाहतूकीचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. लोकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या या तथाकथित ठेकेदारांवर वेळीच आवर घालण्याची मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा