MB NEWS- *..रस्त्यावर उतरू, न्यायालयात दाद मागू पण ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही - पंकजाताई मुंडे* _*२६ जून रोजी राज्यभर करणार 'चक्का जाम' आंदोलन*_
*..रस्त्यावर उतरू, न्यायालयात दाद मागू पण ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही - पंकजाताई मुंडे*
_*२६ जून रोजी राज्यभर करणार 'चक्का जाम' आंदोलन*_
मुंबई । दिनांक १८।
राज्य सरकार ओबीसींची बाजू नीटपणे मांडू शकले नाही, त्यामुळेच राजकीय आरक्षण गेलं. यासाठी आता आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे येत्या २६ जून रोजी राज्यभर 'चक्का जाम' आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
ओबीसी आरक्षण प्रश्नांवर भाजप नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. चंद्रशेखर बावनकुळे, आ. मनिषा चौधरी, योगेश टिळेकर आदी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या," आरक्षण हा सर्वच पक्षातील ओबीसी नेत्यांचा हा विषय आहे. आम्ही ओबीसींच्या हितासाठी काहीही करायला तयार आहोत. आज पक्षानं घेतलेल्या बैठकीत असा निर्णय झाला आहे की, २६ जून रोजी आम्ही चक्का जाम करणार आहोत. त्यामुळे ओबीसी नेत्यांच्या बैठकीबद्दल चर्चा करण्यात अर्थ नाही. मंत्र्यांना भरपूर अधिकार असतात. सरकारला भरपूर अधिकार असतात. त्यावेळी आमच्याकडे निर्णयक्षमता होती. योग्य निर्णय घेण्याची आमची नियत होती. त्यामुळे आम्ही ओबीसींचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी पावलं टाकली. अध्यादेश काढले. या सरकारची मानसिकता तशी नाही. त्यामुळे तो अध्यादेश बाद झाला. राज्य सरकार ओबीसींची बाजू मांडू शकले नाहीत म्हणून आरक्षण गेलं आहे. त्यामुळे आता मंत्री असणाऱ्यांना आंदोलन करण्याची काय गरज आहे? त्यांनी निर्णय घेण्याची गरज आहे. त्यांनी तत्काळ निर्णय करावा. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. आम्ही न्यायालयातही जाऊ," असा इशारा पंकजाताई मुंडे यांनी दिला.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा