MB NEWS-प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करा; प्रशिक्षण देणे हि शासनाची जबाबदारी - मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन
प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करा; प्रशिक्षण देणे हि शासनाची जबाबदारी - मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन
*अन्यथा तीव्र आंदोलन करणार*
परळी वै:दि 24 प्रतिनिधी
सेवांतर्गत प्रशिक्षण हा शैक्षणिक प्रक्रियेचा भाग आहे. आपल्या शिक्षक कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. असे असतानाही वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी दोन हजार रूपये शुल्क आकारण्याचा फतवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने काढला असून शुल्क आकारणी ताबडतोब रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी. एस. घाडगे, सरचिटणीस व्ही.जी. पवार आणि राजकुमार कदम,बंडू अघाव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या बाबतीत मराठवाडा शिक्षक संघाचे ता.सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली अधिक माहिती अशी की बारा व चोवीस वर्षांच्या अर्हताकारी सेवे नंतर शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ दिला जातो. यासाठी शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे मार्फत प्रशिक्षण आयोजित करते. वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्यासाठी प्रशिक्षण ही महत्त्वाची अट असल्याने प्रशिक्षण आयोजित करावे अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने सातत्याने केली होती. परंतु 2017 पासून शासनाने प्रशिक्षण आयोजित न केल्याने सुमारे पन्नास हजार शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीच्या लाभा पासून वंचित आहेत. शासन आयोजित करत असलेली ही प्रशिक्षणे निशुल्क तर असतातच परंतु निवासी प्रशिक्षणासाठी शासन प्रशिक्षणार्थीच्या निवास व भोजनाची व्यवस्था करते. असे असताना पुढील वर्षाच्या सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने आयोजित केल्या जाणा-या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी दोन हजार रूपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी घेतला आहे. सदरील निर्णय शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. यामुळे शिक्षक वर्गात प्रचंड असंतोष व संताप निर्माण झालेला आहे. याची दखल घेऊन शुल्क वाढीचा निर्णय ताबडतोब रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस. घाडगे, सरचिटणीस व्ही.जी.पवार, राजकुमार कदम, डी.जी.तांदळे,बंडू अघाव, अशोक मस्कले,के.आर.कस्बे, महादेव धायगुडे, परवेज देशमुख, राजकुुमार लाहोटी, राजेश साखरे, अलिशान काजी, बंडू चव्हाण, अविनाश लोणीकर, श्रीहरी दहिफळे, ज्ञानोबा गडदे,सुरेश पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा