MB NEWS-आरोपीला अटक करुन कारवाई करण्याची मागणी
परळीत सकल राजस्थानी समाजाच्या वतीने संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी निवेदन
आरोपीला अटक करुन कारवाई करण्याची मागणी
परळी (प्रतिनिधी-)
नांदेड येथील बांधकाम व्यावसायीक संजय बियाणी यांची माथेफिरुने हत्या केली. परळी सकल राजस्थानी समाजाच्या वतीने आज निषेध व्यक्त करण्यात आला. आरोपीला अटक करुन त्याच्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी समाजाच्या वतीने तहसिलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी 11 वा. शहरातील प्रमुख मार्गावरुन मोटारसायकल रॅली काढून समाज बांधव तहसिल कार्यालयावर धडकले.
परळी येथील सकल राजस्थानी समाजाच्या वतीने बांधकाम व्यावसायीक संजय बियाणी यांच्या मारेकर्यांना अटक करावी या मागणीसाठी परळी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. संजय बियाणी यांच्या निघृण हत्येच्या पार्श्वभूमीवर सकल राजस्थानी समाज संतप्त झाला असून आज पोलीस प्रशासनाच्या विरोधात तिव्र घोषणा देत मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
Click: परळी शिवारात विहिरीत आढळला मृतदेह*
परळी तालुका माहेश्वरी सभा व सकल राजस्थानी समाज परिवारातील सदस्यांनी एकत्र येऊन परळी तहसिल कार्यालयास निवेदनात म्हटले आहे की,नांदेड येथील व्यावसायीक संजय बियाणी हे समाजाचे कार्यकर्ते असून उद्योग व्यवसायासोबत सामाजिक कामातही अग्रेसर असतात. नांदेड येथील माहेश्वरी समाजातील गरजूंना 21 रो-हाऊसेस व 52 सदनिका अत्यंत अल्पदरात उपलब्ध करुन दिल्या असून अत्यंंत काबाडकष्ट करुन त्यांनी शुन्यातून आपले विश्व निर्माण केले आहे. समाजाभिमुख उपक्रमातही ते नेहमीच आघाडीवर असतात. अशा एका समाजासाठी काम करणार्या व दानशूर व्यक्तीमत्व असलेल्या संजय बियाणी यांच्या हत्येमुळे प्रामाणिक व सामाजिक काम करणार्या सर्वांसमोरच जिवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भरदिवसा गोळ्या घालून झालेली हत्या मानवतेला काळीमा फासणारी असून या घटनेचा परिणाम बियाणी यांचे कुटूंबीय तसेच समाज मनावर विपरीतपणे झाला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करुन या मागे कोण आहेत? याचा शोध घेत गोळ्या घालणार्या त्या नराधमांना अटक करुन त्यांना कठोर शासन करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. आज निघालेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरातील राजस्थानी समाजातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. समाजातील मान्यवर नागरिकांसह व्यापारी, डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक आदींसह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते. घोषणांनी तहसिल परिसर गजबजून गेला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा