MB NEWS-दोन गावांना जोडणारा पुल नसल्याने ग्रामस्थांना करावा लागतोय नदीपात्रातून प्रवास
पंकजाताई मुंडेंना व्हिडीओ काॅल करून बुलढाणा जिल्हयातील ग्रामस्थांनी मांडली व्यथा;पंकजाताई मुख्यमंत्र्यांना भेटल्या ; प्रश्न मार्गी लावण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
दोन गावांना जोडणारा पुल नसल्याने ग्रामस्थांना करावा लागतोय नदीपात्रातून प्रवास
मुंबई ।दिनांक २१।
सिंदखेडराजा व देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) तालुक्यातील दोन गावांना जोडणारा पुल नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठया अडचणीला सामोरे जात नदीपात्रातून प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी ही समस्या आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना व्हिडीओ काॅल करत त्यांचेसमोर मांडली. पंकजाताईंनी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून यासंदर्भात पत्र दिल्यानंतर हा प्रश्न लवकर सोडविण्याचा शब्द त्यांनी पंकजाताईना दिल्याने ग्रामस्थ सुखावले आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यातील मौजे जळगाव आणि देऊळगावराजा तालुक्यातील पिंपळगांव या दोन गावांना जोडणारा पुल नाही. सध्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. पुल नसल्याने दोन्ही गावातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना वाहतूकीसाठी नदी पात्रातूनच प्रवास करावा लागतो त्यामुळे त्यांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी गावांतील सामाजिक कार्यकर्ते डॉ.सुनील कायंदे यांच्या माध्यमातून आज दुपारी पंकजाताई मुंडे यांच्याशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. पंकजाताईंनी यावेळी ग्रामस्थांच्या अडचणी व त्यांची व्यथा जाणून घेतली. पुलाची निर्मिती करून होणारा त्रास कमी करावा अशी विनंती सर्व ग्रामस्थांनी यावेळी केली. यासंदर्भात पंकजाताईंनी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्र दिले आणि लवकरात लवकर पुलाचा प्रश्न सोडवण्याची विनंती केली, यावर मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावू असा शब्द देत संबंधित विभागाला आदेशित केले.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा