MB NEWS- प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थी घडवून कांदे सरांनी तालुक्याचे नाव यशोशिखरावर नेले - डॉ.भालचंद्र चेवले
आदर्श शिक्षक सौदागर कांदे यांचा विद्यावर्धिनी विद्यालयात गौरव
प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थी घडवून कांदे सरांनी तालुक्याचे नाव यशोशिखरावर नेले - डॉ.भालचंद्र चेवले
परळी (प्रतिनिधी)
परळी शहराला, तालुक्याला आणि येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा काय असते हे आदर्श शिक्षक सौदागर कांदे यांच्यामुळे कळले. ज्या वेळेस तांत्रिक साधने कमी होती, मोबाईल फोन नसायचे अशा काळात विद्यार्थ्यांमध्ये आहे त्या साधनाचा वापर करून स्पर्धा परीक्षेचे बीज कांदे सरांनी हजारो विद्यार्थ्यांत रुजवले. शिष्यवृत्तीच्या अनेक परीक्षामधून शहरातील विद्यार्थी राज्यात प्रथम आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. माझ्या डॉक्टरी भाषेत सांगायचे झाले तर कांदे सर या समाजाचे डॉक्टर आहेत. जे की विद्यार्थी घडवतात. शारीरिक, बौद्धीक आणि मानसिक तयारी कशी करून घ्यायची याची कलाच त्यांच्याकडे आहे असे गौरवोदगार डॉ.भालचंद्र चेवले यांनी काढले.
याबरोबरच विद्यावर्धिनी विद्यालयातील उत्कृष्ठ कार्याबद्दल अनेक मान्यवरांनी गौरवोदगार काढले. कांदे सरांनी शाळेच्या जडण घडणीत मोलाचा वाटा उचलला असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. विद्यावर्धिनी विद्यालयात आदर्श शिक्षक सौदागर कांदे यांच्यासह शालेय क्रीडा स्पर्धेतील योगदानाबद्दल व शैक्षणिक कामगिरीबद्दल विजय मुंडे यांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, विद्यवर्धिनी विद्यालय आणि विवेकवर्धिनी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रभूअप्पा इटके, सदस्य सुभाष भिंगोरे, एम.टी.मुंडे, विद्यावर्धिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुमठाणे, नीला सर, विवेकवर्धिनीचे मुख्याध्यापक श्री नांदुरकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंगरगे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा