MB NEWS-विमा कवच मंडळनिहाय नव्हे तर गावनिहाय द्या- कॉ. एड. अजय बुरांडे
घरच्या भाकरी घेऊन भरपावसात आंदोलन:रूमणे दाखवीत शेतकऱ्यांचा विमा कंपनी व सरकारला इशारा
■विमा कवच मंडळनिहाय नव्हे तर गावनिहाय द्या- कॉ. एड. अजय बुरांडे
बीड / प्रतिनिधी
सोयाबीन पिकाच्या पायी शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली तरी विमा कंपन्या त्यांचा हेका सोडायला तयार नाहीत. केंद्रात आणि राज्याच्या सभागृहात निवडून पाठवलेल्या प्रतिनिधींचं काम आहे की त्यांनी शेतकऱ्यांना पुरक असे निर्णय सभागृहात मंजूर करून घ्यायला हवेत. परंतु गोगलगाय आमचं सोयाबीन खाते तरी विमा कंपनी म्हणते गोगलगायीने केलेलं नुकसान किटकामध्ये मोडत नाही, सलग 27 दिवस पावसाचा खंड पडतो तरी विमा कंपनी एक ते दिड मिलिमीटर पाऊस दाखवून विमा नाकारत आहेत. आता कंपन्यांची ही मग्रुरी कदापिही खपवून घेतली जाणार नाही. सभागृहात बसलेल्या लोकप्रतिनिधींनी आता मंडळनिहाय ही संकल्पना बदलून गावनिहाय संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आज किसान सभा दाखवत असलेलं रूमणं कंपन्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या जिवावर राजकारण करू पाहणाऱ्यांसाठी इशारा असेल, असा खणखणीत इशारा अखिल भारतीय किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिला आहे.
कॉ. बुरांडे म्हणाले, विमा कंपन्या जेव्हा करार करीत होत्या तेव्हाच त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात टाकलेल्या अटी व शर्थी संदर्भात.किसान सभा वारंवार जिल्ह्यातील मा आमदार मा पालकमंत्री, मा खासदार यांना भेटून ह्या गोष्टी लक्षात आणून देत आली आहे. आज प्रत्येक गावात सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले आहे. सुरुवातीला पाऊस जास्त झाला आणि नंतर पावसाने खंड दिला म्हणून प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र कंपन्या प्रत्यक्ष परिस्थिती मान्य करायला तयार नाहीत. किसान
सभेनं जेव्हा प्रशासन दरबारी लढा दिला तेव्हा कुठे महसुलचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पंचनामे करायला लागले. जिल्ह्यातील 86 महसूल मंडळात सोयाबीनचे नुकसान झालेले असून प्रशासनाने आधी 16, नंतर 10 आणि नंतर 21 असे मिळून 47 मंडळात सोयाबीनला अग्रीम मंजूर केला आहे. उर्वरित 39 महसूल मंडळ अजुनही अग्रीमपासून वंचित ठेवलेली आहेत. सरसकट नुकसान अग्रीम मिळायला हवा, अशी किसान सभेची मागणी आहे. प्रशासनाने याउपरही शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन उभारू असा इशाराही कॉ. अजय बुरांडे यांनी दिला.
याप्रसंगी किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी मुरलीधर नागरगोजे दत्ता डाके जगदीश फरताडे पांडुरंग राठोड यांची भाषणे झाली
*■शेतकऱ्यांच्या घोषणा आणि झेंडे ठरले लक्ष्यवेधी*
*■घरच्या भाकरी घेऊन स्वतःच्या खर्चाने कष्टकरी शेतकरी आंदोलनात सहभागी*
*■भरपावसात आंदोलन सुरू*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा