MB NEWS-समाजासाठी झिजणारी माणसं;ही देशाची खरी संपत्ती - प्रभाकर वाघमोडे
समाजासाठी झिजणारी माणसं;ही देशाची खरी संपत्ती - प्रभाकर वाघमोडे
श्री.बाबुराव रुपनर, श्री.शामसुंदर महाराज यांचा सन्मान सोहळा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :: स्वतःच्या प्रगतीसाठी सगळेच प्रयत्न करतात परंतू समाजाच्या उन्नतीसाठी जे दिवस- रात्र झिजतात तेच खरी देशाची संपत्ती असतात. परळीचे नायब तहसिलदार श्री. बाबूराव रुपनर आणि वडखेलचे सुपूत्र, ज्येष्ठ पत्रकार श्री.शामसुंदर महाराज सोन्नर हे असेच समाजासाठी सतत प्रयत्न करणारे रत्न आहेत. अशा सामाजिक कार्यासाठी झिजणा-या माणसांच्या पाठीशी उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे, असे उद्गार बीड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती श्री.प्रभाकर वाघमोडे यांनी काढले.
शासकीय सेवेत गुणवत्तापूर्ण कार्य करणारे नायब तहसिलदार श्री.बाबूराव रुपनर आणि ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध कवी, विवेकी कीर्तनकार श्री. शामसुंदर महाराज सोन्नर यांना झी टाॅकीजकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा वडखेल येथे आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते श्री.रत्नाकर देवकते आणि श्री. गोविंदराव देवकते यांच्या पुढाकाराने आयोजिलेल्या या सोहळ्याच्याअध्यक्षस्थानी श्री.
प्रभाकर वाघमोडे होते. तर प्रमूख पाहुणे म्हणून श्री. व्यंकटेश चामनर सर उपस्थित होते. या सोहळ्याची माहिती मिळताच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. ज्यात काॅम्रेड अजय बुरांडे, अंबाजोगाई पंचायत समितीचे सदस्य श्री. रखमाजी सावंत, मा. सरपंच श्री. देविदास देवकते,प्रा.श्री. दिनेश गडदे सर,कॉम्रेड शेतकरी नेते श्री. कालिदास अपेट, काँग्रेस नेते ॲड. माधव जाधव, शेतकरी कामगार पक्षाचे नेते श्री. मोहन गुंड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह श्री. मनोहर जायभाये, श्री. सुधाकर तट, जिल्हाध्यक्ष श्री. हनुमंत भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष सौ. सुकेशीनी नाईकवडे यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना श्री.व्यंकटेश चामनर सर म्हणाले की, आज एकविसाव्या शतकातही समाजातील अंधश्रद्धा कमी होत नाहीत. अशा वेळी श्री.शामसुंदर महाराज सोन्नर कीर्तनातून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर बाबुराव रुपनर हे शासकीय अधिकारी म्हणून मिळालेल्या संधीचा उपयोग गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी करीत आहेत. त्यांचे हे कार्य समाहिताचे तर आहेच परंतू तरुणांसाठी आदर्श आहे, असेही श्री. व्यंकटेश चामनर सर म्हणाले.
देशाची सध्याची परिस्थिती खूपच भयावह आहे. ज्या संविधानावर देशाचा कारभार चालतो त्या संविधानाची मोडतोड केली जात आहे, अशावेळी शामसुंदर महाराज सोन्नर संविधान जागृतीसाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत धावपळ करीत आहेत, हा आजच्या परिस्थितीत आशेचा किरण आहे, असे गौरवोद्गार काॅ. अजय बुरांडे यांनी काढले. सत्काराला उत्तर देताना श्री.बाबुराव रुपनर आणि श्री.शामसुंदर महाराज सोन्नर यांनी संयोजकांचे आभार मानले. भविष्यातही आपले काम अधिक जबाबदारीने पार पाडू, अशी ग्वाही दिली. प्रकाश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी गावातीला बंधू - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसन संतराम देवकते, संतराम श्रीपती देवकते, माणिक देवकते, अशोक कोचे, सर्जेराव देवकते, प्रकाश तायराम देवकते, गणेश भीमराव देवकते यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा