MB NEWS-जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन !
जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन !
पुणे- साहित्य,लेखन,अभिनय,दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात आपली छाप सोडणारे चतुरस्त्र अभिनेते विक्रम गोखले यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले.गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.तुझेच मी गीत गात आहे या टीव्ही मालिकेत ते सध्या काम करत होते.गोखले यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी ८२ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काहीच दिवसात अभिनेत्याच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. विक्रम यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवले आहेत. रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. सध्या विक्रम गोखले ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मालिकांविषयी बोलायचे झाल्यास काही वर्षांपूर्वी आलेली त्यांची स्टार प्रवाहची मालिका ‘अग्निहोत्र’ विशेष गाजली होती. या मालिकेत विक्रम यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे, अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले, सन २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले, घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला.
विक्रम गोखले यांना घरातून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले पुर्वीच्या कमलाबाई कामत या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. 1913 मध्ये दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी 71 हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. विक्रम गोखले यांच्या पत्नीचे नाव वृषाली आहे. सध्या नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे काम ते करत आहेत. अल्पशा आजाराने २२ नोव्हेंबर रोजी पुणे येथे खाजगी इस्पितळात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीने एक चांगला अभिनेता गमावला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा