MB NEWS:ग्रामविकास पॅनलच्या वतीने पौळ पिंपरीत घेण्यात आली जाहीर आभार सभा
जनतेने विकासाला मत दिलं; आ.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गावचा कायापालट करू - लक्ष्मण पौळ
ग्रामविकास पॅनलच्या वतीने पौळ पिंपरीत घेण्यात आली जाहीर आभार सभा
परळी (प्रतिनिधी)
ग्रामपंचायत निवडणूक २०२२ मध्ये ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदासहित सात उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून दिले. याबद्दल पौळ पिंपरी येथे बुधवार दि.२१ डिसेंबर रोजी जाहीर आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ म्हणाले की, राज्याचे माजी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांत गावात अनेक विकास कामे झाली. हाच विकास लक्षात घेऊन जनतेने आम्हाला कौल दिला आहे. जनतेने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आगामी काळात आ.धनंजय मुंडे व वाल्मीक अण्णा कराड यांच्या नेतृत्वाखाली गावाचा विकासाच्या दृष्टीने कायापालट करू असे आश्वासन उपस्थित सर्वांना लक्ष्मण तात्या पौळ यांनी दिले.
पौळ पिंपरी ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार माणिक रामभाऊ पौळ यांच्यासह सात सदस्यांना बहुमताने निवडून दिले. माणिकराव पौळ यांची विजयाची ही सलग हॅटट्रिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांच्या नेतृत्वाखाली हा विजय साकार झाला आहे. झालेल्या निवडणुकीतील विजयाबद्दल आणि जनतेने दिलेल्या आशीर्वादाने आभार मानण्यासाठी आभार सभेचे ग्रामपंचायत प्रांगणात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अश्रुबा दादा काळे होते तर व्यासपीठावर बबनराव पौळ, वसंतराव राठोड, नवनिर्वाचित सरपंच माणिकराव पौळ यांच्यासह गावातील अनेक ज्येष्ठांची उपस्थिती होती. ग्रामविकास पॅनलच्या विजयी उमेदवारांचे सुदामराव कोल्हे, कारभारी शिंदे, बाबासाहेब चव्हाण, सल्लाउदिन पठाण, नामदेव राजभोज, भगवानराव डिकले, जालिंदर शिंदे, अशोक दळवी, बाबा डिकले, भीष्माचार्य सावंत, मारोतराव पांढरे, दत्तराव सपकाळ, भागवत हेगडकर आदींनी सत्कार केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दत्तात्रय काळे यांनी प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमात बोलतांना बबनराव पौळ म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत गेल्या २० वर्षांपासून जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे. गावचा विकास करण्याबरोबरच गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण अबाधित ठेवण्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले गेले आहे. धन शक्तीच्या विरोधात लढतांना जनतेने आम्हाला मतरुपी दिलेले आशीर्वाद आम्ही कधीही विसरणार नाहीत. कार्यक्रमाचे अध्यक्ष अश्रूबा दादा काळे यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की, निवडणुका या लोकशाहीचा उत्सव असतात. मतदार आता सुज्ञ झाले आहेत, निवडून देतांना मतदारांनी योग्य उमेदवारांना कौल दिला असल्याचे त्यांनी म्हटले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा