MB NEWS:राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी
किर्तन मनोरंजनाचे नाही तर ते समाज परिवर्तनाचे साधन आहे - ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले
परळी वैद्यनाथ दि. ७(प्रतिनिधी)किर्तन हे मनोरंजनाचे नाही तर ते समाज परिवर्तन चे शक्तीशाली साधन असून या साधनाकडे मनोरंज म्हणून पाहणे अतिशय चूकीचे असून किर्तनकारांनी सुध्दा हे पातक करू नये. तसेच संताची पुजा न करता केवळ देवाची पूजा करणे सुध्दा अधर्मच ठरतो असे प्रतिपादन हरी भक्ती परायण गुरूवर्य पांडुरंग महाराज घुले यांनी परळी वैद्यनाथ,शक्तीकुंज वसाहत येथे आयोजीत ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय संत भगवान यांच्या पुण्यतिथी सोहळ्या प्रसंगी केले.
शनिवार दि. ७ जानेवारी रोजी परळी वैद्यनाथ शहरातील शक्तीकुंज वसाहत या ठिकाणी ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
जगद्गुरु संत तुकाराम गाथा मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांनी संत तुकाराम महाराज यांच्या संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥१॥
तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ध्रु.॥
कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥२॥
तुका म्हणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संतांचिया ॥३॥
या अंभगांचे आपल्या किर्तनातून विवेचन करतांना सांगीतले की, संतांची संगती आपणास कोणत्याही प्रकारे घडली तरी आपला उध्दार होतो. हे पटवून देतांना त्यांनी दरोडेखोर असणारा वाल्या कोळी महर्षी नारदांना लुटण्यासाठी आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने संग घडला. तरी ही महर्षी नारदांनी त्यांचा उध्दार केला. तसेच हरवलेली म्हैस विचारण्यासाठी गेलेला गंगाधर याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी उपदेश करून त्यालाही संन्मार्गाला लावले. एवढे च नाही तर चांगल्या व्यक्ती च्या दारात श्वान होऊन जरी राहीले तरी तेथे कानी पडणार्या हरीनामामुळे उध्दार होतो. त्यासाठी संताच्या संगतीत आणि संत सेवेत लिन व्हावे असे त्यांनी सांगितले.
संयोजन समिती च्या वतीने महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेची भव्य रथामधून मिरवणूक काढण्यात आली . गेली पंचवीस वर्षापासून शक्तीकुंज वसाहत येथे हा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा