MB NEWS:संतती सद्गुणी नसेल तर निसंतान असलेलं बरं :-रामायणाचार्य ह.भ.प.ढोक महाराज
लेक माझा अभिमान: ढोक महाराजांच्या किर्तनाचे आयोजन करुन केला मुलीचा वाढदिवस
संतती सद्गुणी नसेल तर निसंतान असलेलं बरं :-रामायणाचार्य ह.भ.प.ढोक महाराज
डॉ.पांडुरंग चाटे यांच्याकडून कन्येचा जन्मोत्सव अनोख्या पध्दतीने साजरा
परळी वैद्यनाथ दि.१८(प्रतिनिधी) स्त्रीभृण हत्येचा कलंक लागलेल्या परळी वैद्यनाथ तालुक्यातील मांडवा(परळी) गावचे सुपूत्र डॉ.पांडुरंग चाटे यांनी मात्र आपल्या कन्येचा जन्म दिवस अनोख्या पध्दतीने साजरा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान त्यांनी रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचे हरी किर्तन आणि नगर भोजन आयोजीत करून कन्या चिरंजिवी श्रीजा हिचा प्रथम जन्मोत्सव साजरा केला.
समाजात एकीकडे मुलगी नको म्हणून तीची गर्भातच जन्माला येण्यापूर्वीच हत्या केली जाते. त्यातही स्त्रीभृण हत्येचा कलंक लागलेल्या परळीत सकारात्मक बाब घडली आहे. तालुक्यातील मांडवा गावचे सुपूत्र डॉ. पांडुरंग बळीराम चाटे यांनी मात्र समाजापुढे आपल्या कृतीतून नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपली कन्या चिरंजिवी श्रीजा हिचा प्रथम वाढदिवस सोमवार दि. १६ जानेवारी रोजी अनोख्या पध्दतीने साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने नगर भोजन आणि रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचे हरी किर्तन आयोजीत केले होते. त्यांनी संत जनाबाई यांच्या
ऐसा पुत्र देंई संतां ।
तरी त्या आवडी पंढरिनाथा ॥१॥
गीता नित्य नेमें ।
वाची ज्ञानेश्वरी प्रेमें ॥२॥
संतांच्या चरणा ।
करी मस्तक ठेंगणा ॥३॥
कन्या व्हावी भागीरथी ।
तुझे प्रेम जिचे चित्तीं ॥४॥
ऐसे करी संतजना ।
दासी जनीच्या निधाना ॥५॥या अंभगांचे निरुपण करतांना महाराजांनी सांगीतले की आपल्या पोटी भगवान विठ्ठलावर निस्सीम श्रद्धा, नित्याने गीता, भागवत, ज्ञानेश्वरी यांचे वाचन करणारा संत जन्माला यावा. मुलगी असेल तर ती भागीरथी सारखी पवित्र असावी. संतती सद्गुणी नसेल तर निसंतान असलेलं बरं असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला परळी वैद्यनाथ पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा