MB NEWS:महर्षी दयानंद द्विशताब्दीवर्षा निमित्त परळी येथे विचारसंस्कार सप्ताह व स्पर्धांचे आयोजन
महर्षी दयानंद द्विशताब्दीवर्षा निमित्त परळी येथे विचारसंस्कार सप्ताह व स्पर्धांचे आयोजन
परळी वैजनाथ,दि.११-
थोर समाजसुधारक व वेदोद्धारक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती त्यांच्या २०० व्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आज (दि.१२) होत आहे. वर्षभरात होणाऱ्या विविध राष्ट्रीय उपक्रमांचे उद्घाटन नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. यानिमित्त परळीसह राज्यात देखील विविध कार्यक्रमांची सुरुवात होत आहे.
या अनुषंगाने परळी येथील आर्य समाजाच्या वतीने दि. १२ ते१९ फेब्रुवारी दरम्यान "महर्षी दयानंद विचार सप्ताह" साजरा होत असून आठवडाभर प्रबोधनपर व्याख्याने वक्तृत्व स्पर्धा, सत्संग व इतर कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. पहिल्या दिवशी स.९ वाजता दिल्ली येथे होणारे पंतप्रधान मोदी यांचे भाषण थेट मोठ्या पडद्यावर पाहण्याची व्यवस्था आर्य समाज मंदिरात स.९ वा. करण्यात आली आहे. यात शहरातील नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
सप्ताहाभरात दररोज सकाळी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी "मानवता संस्कार प्रबोधन" कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.यात विद्यार्थ्यांना मूल्यसंस्कार , माणुसकी, सच्चारित्र्य, राष्ट्रीय व सामाजिक कर्तव्यांची जाणीव, मातृ-पितृसेवा, स्वअस्तित्वाचा बोध, ध्येयनिष्ठा, मानसिक शक्ती संवर्धन इत्यादी विषयांवर तज्ज्ञ विद्वानांकरवी प्रबोधन दिले जाणार आहे. तसेच दि.१८ फेब्रुवारी रोजी सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी "स्वामी दयानंद यांच्या जीवन व कार्य" या विषयावर वेगवेगळ्या गटातून भाषण स्पर्धा ठेवण्यात आली आहे. तरी या विविध कार्यक्रमात नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आर्य समाजाचे प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया, मंत्री श्री उग्रसेन राठौर, कोषाध्यक्ष देविदासराव कावरे, संयोजक श्री रंगनाथ तिवार व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा