MB NEWS:गाईच्या गोडजेवणातून माणुसकीचे दर्शन
गाईच्या गोडजेवणातून माणुसकीचे दर्शन
■ गोमातेच्या संगोपणातून चैतन्याची प्राप्ती होते - ह.भ.प चाटे महाराज
परळी वै ( प्रतिनिधी ) दि.३ फेब्रुवारी २०२३
भारतीय संस्कृतीत गोमातेचे विशेष महत्व आहे. सर्व पौराणिक शास्त्र परंपरेत गोमातेचे महत्व विशद केले आहे. गोमतेच्या पूजनातून आत्मानंदाची प्राप्ती होते तर गोमतेच्या संगोपणातून, सहवासातून चैतन्याची प्राप्ती होते तसेच जीवन अनेक रोगांपासून मुक्त होत असल्याचे प्रतिपादन खापरटोन येथे आयोजित गाईच्या गोडजेवनाच्या कार्यक्रमात बोलताना ह.भ.प.तुकाराम महाराज चाटे यांनी केले.
आधुनिक उपयुक्ततावादी काळात प्राण्यांकडे केवळ उपयोगी दृष्टीने पाहण्याची वृत्ती वाढत आहे. केलेल्या उपकाराची जाण ठेऊन त्या ऋणातून उतराई होण्याची कृती मात्र कुठं पाहायला मिळत नाही. जिथे आई वडीलांबद्दलसुद्धा कृतज्ञता न ठेवता त्यांचं गोडजेवनही न करणारे अनेक लोक समाजात पाहायला मिळतात. परंतु मुक्या प्राणी मात्रांची, विशेषतः गोमतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिढ्यान्पिढ्यांपासून शेती व्यवसायात रूढ असलेले खापरटोन येथील शेतकरी श्री.हनुमंत श्रीरंग चाटे यांनी गोमतेच्या निधनानंतर गोडजेवणाच्या कार्यक्रमाचे व अन्नदानाचे आयोजन केले होते.
गाईला ‘कामधेनू’ ची उपमा दिलेली आहे. देव – दानवांच्या समुद्र-मंथनातून प्रगट झालेल्या चौदा रत्नांमध्ये कामधेनूचा उल्लेख आलेला आहे. स्वर्गलोकी वास्तव्य असलेल्या गोमातेला जनकल्याणासाठी ‘कपिल मुनिंनी’ भूलोकात स्थान दिले. कामधेनू अर्थात गोमाता ही सर्व मनुष्य – प्राण्यांसाठी एक वरदान आहे. असेही ह.भ.प चाटे महाराज यावेळी बोलताना म्हणाले. प्रसंगी कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा