MB NEWS:केशवराज विद्यालया पालक मेळावा
केशवराज विद्यालया पालक मेळावा
लातूर दि २७ : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये केशवराज विद्यालयातील इयत्ता नववीतून दहावीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा भव्य असा पालक मेळावा श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात आज दि.२७/३/२०२३ रोजी संपन्न झाला. या पालक मेळाव्यास अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मा.श्री धनंजय तुंगीकर तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक पालक संघ उपाध्यक्षा साै.अनुराधा दगडगुंडे,स्थानिक समन्वय समिती कार्यवाह, तथा शालेय समिती अध्यक्ष,मा.श्री शैलेश कुलकर्णी, मुख्याध्यापक मा.श्री प्रदीप कुलकर्णी, दहावी प्रमुख श्री आदिनाथ कदम,दहावी सहप्रमुख श्रीमती शैलजा देशमुख यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने या मेळाव्याची सुरुवात झाली.वर्षभराचे नियोजन कशाप्रकारे असेल याची माहिती दहावी प्रमुख श्री आदिनाथ कदम यांनी दिली.
भाषा विषयाचे मार्गदर्शन श्रीमती वनमाला कलुरे यांनी केले.गणित - विज्ञान या विषयाची मांडणी श्री लक्ष्मीकांत बुगदे यांनी केली तर सामाजिक शास्त्र व श्रेणी विषयाची माहिती श्री त्रिंबक कुलकर्णी यांनी दिली.पालक मनोगतातून पालकांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करतांना शाळेकडून त्यांना अपेक्षित असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या. शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा साै. अनुराधा दगडगुंडे यांनी आपल्या मनोगतात असे म्हणाल्या, की शिक्षक व पालकांची भूमिका मित्र म्हणून असावी.आपले नाते दृढ करण्यासाठी आपल्या पाल्याशी संवाद वाढवावा. पाल्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे सांगितले.
श्री. केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री प्रदीप कुलकर्णी यांनी पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, की पालकांनी आपल्या पाल्यांच्या क्षमतेनुसार अपेक्षा ठेवाव्यात. आपल्या पाल्याला शिक्षणाबरोबरच सुसंस्कारांचीसुद्धा जोड मिळावी यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांकडूनही प्रयत्न व्हावेत. तसेच आगामी वर्षभर शाळेला पालकांचे सहकार्य मिळावे ही भावना व्यक्त केली. विद्यार्थी व मोबाईल या प्रश्नाविषयी पालकांना सुचविले की ' पालकांनी विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवून आजच्या काळात अत्यंत उपयुक्त असलेल्या मोबाईलचा विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी सुयोग्य वापर करावा.याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करून द्यावा,पण दैनंदिन निरीक्षणातून त्याचा योग्य वापर होतो आहे का? हे सुद्धा पाहणे आवश्यक असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास पालकांनी करणे गरजेचे आहे. यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारीही पालकांनी करून घ्यावी असे आवाहन मुख्याध्यापकांनी याप्रसंगी केले.
अध्यक्षीय समारोपात कार्यक्रमाध्यक्ष श्री धनंजय तुंगीकर यांनी 'विद्यार्थी व पालक हे दोघेही शाळेसाठी महत्त्वाचे असून पालकांनी सुद्धा नियमित शाळेच्या संपर्कात राहून शाळेतील शिक्षकांसोबत तसेच प्रशासनासोबत संवाद वाढवून आपल्या पाल्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण संवादामधून त्याच्या अडी-अडचणी,समस्या यांचा अंदाज घ्यावा, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या पाल्याच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले.
सुमारे दोन तास चाललेल्या व सुमारे ६०० पालकांची उपस्थिती राहिलेल्या या पालक मेळाव्याचे प्रास्ताविक, परिचय व मान्यवरांचे स्वागत दहावी सहप्रमुख श्रीमती शैलजा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्रीमती वैशाली फुलसे यांनी केले. श्रीमती जान्हवी देशमुख यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यासभा संयोजक तथा शाळेचे उपमुख्याध्यापक मा.श्री महेश कस्तुरे, पर्यवेक्षक श्री संदीप देशमुख, पर्यवेक्षक श्री बबन गायकवाड,पर्यवेक्षिका मा.श्रीमती अंजली निर्मळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा