गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकविमा योजनेचा एक रुपयामध्ये लाभ घ्यावा - अनिल बोर्डे
गेवराई,(प्रतिनिधी)-
गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकविमा योजनेचा एक रुपयामध्ये लाभ घ्यावा, असे आवाहन बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य तथा गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख अनिल बोर्डे यांनी केले आहे.
कृषी कार्यालय गेवराई व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जुलै २०२३ रोजी दुपारी १-३० वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी शासकीय सदस्य तथा गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख अनिल बोर्डे यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडले. या प्रश्नाबाबत तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांवर कधीही नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ विमा भरणे आवश्यक आहे. विम्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ असून त्यापूर्वी शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये विमा काढून घ्यावा. विमा भरताना शेतकरी वर्गाने सतर्क राहावे. शेतकऱ्यांनी बँक खाते नंबर स्वतःचाच द्यावा व सेतू केंद्र चालकाला अतिरिक्त रक्कम देऊ नये. या योजनेत सहभागी झाल्यानंतर हंगामात पाऊस कमी झाल्यास किंवा पेरणी क्षेत्राच्या ७५ टक्के पेरणी न झाल्यास आणि गारपीट ढगफुटी पिकविमा क्षेत्र जलमय होणे, वीज पडल्यामुळे आग लागणे, पूर, कीड रोगाचा प्रादुर्भाव, वीज कोसळणे वादळ, चक्रीवादळ यामुळे उत्पादनात होणारी घट तसेच पिक काढून सुकवणीसाठी ठेवले असता गारपीट चक्रीवादळ किंवा मोसमी पावसामुळे होणारे नुकसान एवढ्या बाबींसाठी आपले संरक्षण होते.
या वर्षापासून शासनाने शेतकऱ्यांचा विमा हिस्सा भरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नाममात्र एक रुपया ठेवला आहे. तरी गेवराई तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेत सहभागी होऊन आपला पिकविमा काढून घ्यावा, असे अनिल बोर्डे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी कृषी विक्रेत्यांकडे आधार कार्ड देऊन खत खरेदी करावी व जास्त दराने कोणीही खत खरेदी करू नये, असे तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते यांनी चर्चासत्रात सांगितले. शेतकऱ्यांनी प्रधान किसान योजना अंतर्गत इ-केवायसी त्वरित करून घ्यावी व सध्या तालुका कृषी कार्यालयात ४८ पैकी फक्त १२ कृषी सहाय्यक कार्यरत आहेत असेही त्यांनी सांगितले. पिकावर शंकी गोगलगाय आढळल्यास तालुका कृषी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन अभय वडकुते यांनी केले. या चर्चासत्रात गेवराई ग्राहक पंचायतचे अशोक देऊळगावकर, रामेश्वर थळकर व कार्यालयीन कर्मचारी एफ.एस.पठाण यांनी सहभाग घेतला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा