नजीकच्या भविष्यात अंबाजोगाई जिल्हा होणे केवळ अशक्य
जिल्हा विभाजनाचे निकष शासनाने जाहिर करावे; नजीकच्या भविष्यात अंबाजोगाई जिल्हा होणे केवळ अशक्य-अॅड.अतुल तांदळे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सध्या सोशल मिडीयावर अंबाजोगाई जिल्हा निर्मितीबाबत एक पत्र फिरवले जात आहे. या अनुषंगाने शासनाने जिल्हा विभाजनाचे निकष जाहिर करावे तसेच शासकीय समितीचा अहवाल देखील सार्वजनिक करावा अशी मागणी परळी जिल्हा निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष अॅड.अतुल तांदळे यांनी केली आहे. नजीकच्या भविष्यात अंबाजोगाई जिल्हा होणे केवळ अशक्य असल्याचे प्रतिपादन अॅड.अतुल तांदळे यांनी केले.
गेल्या 2 दिवसापासून समाज माध्यमांवर बीड जिल्हा विभाजनाबाबत चर्चांना उधाण आले आहे. याबाबत जिल्हा निर्मिती कृती समितीने संबंधीत यंत्रणेकडे चौकशी केली असता महाराष्ट्रातील नवीन जिल्हा निर्मिती बाबत शासनाकडे कोणतेही स्वरुपाचे निकष नसल्यामुळे मा.अप्पर सचिव (महसुल) यांच्या अध्यक्षतेखाली एखाद्या जिल्ह्याचे विभाजन करुन नविन जिल्हा निर्मिती करण्याबाबत कोणते निकष असावे यासाठी एक समिती नेमली होती. याबाबत समितीने आपला अहवाल शासनकडे दिला असल्याचे समजते. शासनाने निकषास मान्यता दिल्यानंतर निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे महाराष्ट्रात नवीन जिल्हा निर्मिती बाबत प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती अॅड.अतुल तांदळे यांनी दिली आहे. तसेच नविन जिल्हा निर्मितीसाठीचे निकष शासनाने जाहिर करावे अशी मागणी देखील अॅड. तांदळे यांनी केली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर अकारण होत असलेल्या चर्चा या निव्वळ व्यर्थ आहे असेच म्हणावे लागेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा