✍️ अश्विन मोगरकर यांचा विशेष ब्लॉग >>>>>शिवशक्ती दर्शनाने मिळेल महाराष्ट्रातील जनशक्तीच्या बुलंद आवाजाचे वरदान !
शिवशक्ती दर्शनाने मिळेल महाराष्ट्रातील जनशक्तीच्या बुलंद आवाजाचे वरदान !
पंकजाताई मुंडे महाराष्ट्राचा दौरा करणार. महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग, साडेतीन शक्तिपीठांसह राज्यातील अनेक मंदिरांच्या दर्शनासाठी आखलेला हा दौरा. या दौऱ्यात देवदर्शन सोबतच राज्यभरातील त्या त्या भागातील नेते, कार्यकर्त्यांच्या भेटी होणारच आहेत. यात कुठलाही राजकीय अर्थ काढायचा नाही म्हटलं तरीही पंकजताईंचा नऊ वर्षांनंतर संघर्ष यात्रेनंतर सर्वव्यापी असा हा दौरा असेल. 2014 ला काढलेल्या संघर्ष यात्रेच्या आठवणी अजूनही जनतेच्या मनात आहेत.
महाराष्ट्रातील चालू असलेल्या सत्तेच्या साठमारीत आज कोण कोणाकडे राहील हे सांगता येत नाही अशा काळात महाराष्ट्रातील राजकारणात पंकजाताई मुंडे मात्र आपल्या विचारावर ठामपणे उभ्या आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजाताई मुंडे यांचे काय होणार हा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता. परंतु पंकजाताईनी कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा न करता आपलं समाजकार्य, पक्ष कार्य करत राहिल्या. प्रत्येक वेळी पंकजाताई मुंडे नाराज अशा पेडन्यूज चालवून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी मात्र आपण दोन महिने प्रसारमाध्यमांपासून दूर राहणार असल्याचे जाहीर केले.
महाराष्ट्रात चांदा ते बांदा अशी प्रत्येक गाव खेड्यापर्यंत प्रभाव असलेला चेहरा म्हणून पंकजाताई मुंडे या ओळखल्या जातात. आता त्यांनी शिव शक्ती दौरा काढत महाराष्ट्र पुन्हा एकदा पिंजून काढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. महाराष्ट्रातील दहा पेक्षा जास्त जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेत अकरा दिवस शिव शक्ती यात्रा चालणार आहे. 2014 साली पंकजाताई मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढत महाराष्ट्र ढवळून काढला. संघर्ष यात्रेत त्यांना मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होण्यात पंकजताईंनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा मोठा वाटा होता. पंकजाताई मुंडे या आजच्या गढूळ राजकारणातील एक स्वच्छ व नितळ व्यक्तिमत्त्व. आपल्या वडिलांचा, लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा जनसेवेचा वसा पुढे चालवण्यासाठी व शोषित, वंचित, पीडित असणाऱ्या लोकांना मायेचा आधार देण्यासाठी आज त्या राजकारणात आहेत. राज्यातील इतर कुठल्याही नेत्यापेक्षा एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राज्यातील कष्टकरी समाज, ऊसतोड कामगार, शेतकरी त्यांच्याकडे आपल्या तारणहार म्हणून पहातात. फक्त महिला नेतृत्व म्हणून नव्हे तर आजच्या कठोर व सत्तांध राजकारणात सर्वसामान्यांप्रती संवेदनशील राहून आपले कार्य करत राहणाऱ्या पंकजताईंबद्दल विरोधकांनाही आदरच आहे. म्हणून तर कायम पंकजाताई मुंडे आपल्या पक्षात याव्यात यासाठी कायम प्रयत्न करत असतात.
एखाद्या पदासाठी लाचार होण्याच्या काळातही आपला बाणेदार स्वभाव न बदलता आलेल्या प्रत्येक संकटांना घैर्याने तोंड पंकजाताई मुंडे पाय रोवून मजबुतीने उभ्या आहेत. राज्यातील महिला, शेतकरी, ऊसतोड कामगार, कष्टकरी जनता, वंचित वर्ग आज चालू असलेल्या राजकारणाकडे पाहून प्रचंड निराश झाला आहे. हा वर्ग आता पंकजाताई मुंडे यांच्याकडे आशेने पहात आहे. पंकजाताई मुंडे यांचा शिव शक्ती दौरा म्हणजे नक्कीच फक्त देवदर्शनासाठी नसेल. या दौऱ्यात स्थानिक नेते, कार्यकर्ते यांच्या भेटी महाराष्ट्रातील भविष्यकालीन राजकारण बदलवून टाकणारे असेल.
-अश्विन मोगरकर,परळी वैजनाथ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा