श्रावणी वेदप्रचार सप्ताहात आचार्य सानंद यांचे प्रतिपादन
परमेश्वराशी नाते जोडल्यास शाश्वत आनंदाची प्राप्ती
श्रावणी वेदप्रचार सप्ताहात आचार्य सानंद यांचे प्रतिपादन
*परळी वैजनाथ-* दि.२६-
सुखाच्या शोधात भटकत असलेला आजचा मानव भौतिक ऐश्वर्यातून सुखी बनू इच्छितोय, पण त्याची ही इच्छा भगवंताची नाते जोडल्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. यासाठी मानवाने परमेश्वराच्या गुण ,कर्म व स्वभावांना ओळखून ते आत्मसात करणे आणि त्याच्याशी तादात्म्यभाव ठेवणे गरजेचे आहे. यातूनच मानवाला खऱ्या अर्थाने शाश्वत आनंद मिळू शकतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध वैदिक विद्वान आचार्य श्री सानंद शास्त्री (पानिपत, हरियाणा) यांनी केले.
येथील आर्य समाजाच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या श्रावणी वेदप्रचार उत्सवात श्री सानंदजी यांची सकाळी आध्यात्मिक व धार्मिक विषयावर तर रात्री सामाजिक व राष्ट्रीय विषयावर रात्री प्रवचने सुरू आहेत. यासाठी श्रोत्यांची मोठी गर्दी होत आहे. आजच्या आजच्या सत्रात श्री आचार्य यांचे "मानवी जीवनाचे लक्ष- ईश्वर प्राप्ती !" या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. मानवाने परमेश्वराच्या व्यापक स्वरूपाला ओळखून त्याच्याशी आपले नाते जोडावे . परमेश्वराचा प्रत्येक गुण उत्तम प्रकारे आत्मसात करून त्याच्या अनुकूल आत्म्याला चालविल्यास निश्चितच सर्व प्रश्नांची उकल होईल व मानवी जीवनात सुख, शांतता, आनंद व समाधानाची उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.
मेरठ (उत्तर प्रदेश) येथून आलेले भजनोपदेशक पं. अजय आर्य यांनी आपल्या मधुर भजनांच्या माध्यमाने ईश्वरभक्ती, मानवी जीवनाचे कर्तव्य, महर्षी दयानंद यांचे उपकार.. इत्यादी विषयांवर विचार मांडले. दररोज सकाळी पं. वीरेंद्र शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली संपन्न होणाऱ्या यज्ञात शहरातील विविध यजमान सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्य समाजाचे प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया, मंत्री उग्रसेन राठौर ,कोषाध्यक्ष देविदासराव कावरे, जयपाल लाहोटी,लक्ष्मण आर्य गुरुजी, रंगनाथ तिवार इत्यादी प्रयत्नशील आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा