महिला महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
तालुक्यात क्रिडा चळवळ आणखी गतीमान होणे आवश्यक- प्रा.डॉ पी.एल.कराड
महिला महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
परळी वैजनाथ दि.२९ (प्रतिनिधी)
तालुक्यात क्रिडा चळवळीला गती मिळण्याची आवश्यकता असून यासाठी शाळा महाविद्यालयानी पुढाकार घ्यावा.यासाठी आवश्यक ती मदत आमच्या वतीने करु असे प्रतिपादन डॉ. पी.एल. कराड यांनी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिन व वार्षिक क्रिडा महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिना निमित्त वार्षिक क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (ता.२९) मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाले. त्यात सर्वप्रथम हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्यामराव देशमुख यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या वतीने पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, उद्घाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य प्रा डॉ पी.एल. कराड, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख, प्रा. प्रवीण फुटके हे होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. क्रीडा प्रतिनिधी संध्या पवार हिने सर्वांना क्रीडा प्रतिज्ञा दिली. प्रास्ताविक प्रा डॉ प्रवीण दिग्रसकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात यांनी हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाकार्याचा आढावा घेतला . तसेच राष्ट्रीय क्रीडा दिन पंधरा दिवस स्पर्धा घेऊन महाविद्यालयात क्रीडा महोत्सव साजरा करण्यापेक्षा आपण वर्षभर टप्प्याटप्प्याने या स्पर्धा घ्याव्यात म्हणून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपण या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करतो आहोत असे सांगितले. उद्घाटक प्रा डॉ पी एल कराड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शहरातील क्रीडा विश्वाचा आढावा घेऊन तालुक्यात क्रिडा चळवळ गतीमान करणे आवश्यक आहे. परळीच्या मातीत खेळाडूंची खाण आहे. फक्त खेळाडूंना वाव मिळणे आवश्यक आहे. मी यासाठी सर्वतोपरी साह्य करेन अशी ग्वाही त्यांनी दिली.
अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख म्हणाले की, खेळाने स्वतंत्र जीवनदृष्टी लाभते. शरीर आरोग्य निकोप राहते .त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी नियमित विविध क्रीडा प्रकारामध्ये सहभागी व्हावे. त्यासाठी महाविद्यालय त्यांना हव्या त्या सोयी सुविधा देण्यास तयार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ.कल्याणकर यांनी केले तर प्रा डॉ. दिग्रसकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा