पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला - प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे
फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार,महात्मा फुले यांच्या समग्र साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक, परखड व्याख्याते म्हणून सुपरिचित असलेले प्रा. हरी नरके सरांनी आज जगाचा निरोप घेतला. ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला आहे. हे वृत्त मनाला चटका लावणारे आहे.
तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. त्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले आहे.
परिवर्तन चळवळीशी प्रा नरके यांचा नजिकचा संबंध राहिला.महात्मा फुले यांच्या साहित्याचा अभ्यासक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी ५६ पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलं आहे.प्रा.हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली.मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून त्यांचे मोठे योगदान होते.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, त्यांचं कार्य सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोवण्यात हरी नरके यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.प्रा.हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे.प्रा. हरी नरके यांच्यासारखा परिवर्तनवादी लेखक विचारवंत काळाच्या पडद्याआड गेल्याने देश एका महान पुरोगामी विचारवंतास मुकला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा