शोभायात्रा: महर्षी दयानंदांच्या जयघोषाने परळी शहर दुमदुमले
परळी वैजनाथ,दि.३-
थोर समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहरात महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व आर्य समाज परळीच्या संयुक्त विद्यमाने येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात राज्यस्तरीय आर्य महासंमेलनास कालपासून उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्त परळी शहरातून आज (दि.३) भव्य स्वरूपात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. कालपासून येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात राज्यातील विविध ठिकाणाहून आर्य समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.
सकाळी विविध यजमानांच्या उपस्थितीत यज्ञ संपन्न झाला.नंतर शहरातील शिवाजी चौकातून शोभायात्रा निघाली. यात शहरातील चौका - चौकात विविध शाळांचे विद्यार्थ्यांनी लेझीम, योगासने विविध कला प्रदर्शन इत्यादींचे सादरीकरण केले. या शोभायात्रेत सर्वात पुढे घोडेस्वार, नंतर शाळांचे विद्यार्थी, गुरुकुलाचे ब्रह्मचारी, राज्यातून आलेले आर्य कार्यकर्ते , महिला अपूर्व उत्साहात पुढे पुढे चालत होते . उघड्या जीपमध्ये वैदिक विद्वान प्रा. सोनेराव आचार्य, पं. प्रियदत्त शास्त्री, पं. सत्यवीर शास्त्री, पं. राजवीर शास्त्री इत्यादी विराजमान झाले होते. त्याबरोबरच फुलांनी सजलेल्या भव्य अशा रथात उत्तरप्रदेशहुन आलेले स्वामी निर्भयानंद स्वामी , योगमुनिजी, डॉ ब्रह्ममुनिजी, विज्ञानमुनिजी, सोममुनिजी हे साधू संन्यासी , वानप्रस्थी स्थानापन्न झाले होते. या शोभायात्रेत सर्वजण उत्साहात "महर्षी दयानंद की जय, भारत माता की जय, वैदिक धर्म की जय !" असा जयघोष करीत होते .तर काहीजण गीत सादर करत होते. या शोभायात्रेत ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केले . ही शोभायात्रा स्टेशन रोड, मोंढा मैदान, राणी लक्ष्मीबाई टॉवर या मार्गाने जाऊन शेवटी आर्य समाज मंदिरात विसर्जित झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा