क्लास वन अधिकारी बनलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेकडून सहृदय सत्कार
धर्म-जाती पेक्षा शिक्षणच आयुष्य बदलू शकते-प्रमोद सटाले
क्लास वन अधिकारी बनलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेकडून सहृदय सत्कार
परळी / प्रतिनिधी
धर्म-जातीत अडकून पडण्यापेक्षा शिक्षणच हे आपले आयुष्य बदलू शकते.शाळेचे संस्थापक माजी खासदार कॉ.गंगाधरआप्पा बुरांडे यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी हे आदर्श शालेय जीवनापासून मनात रुजली असून त्यांचा या गुणाचा माझ्या आयुष्यामध्ये व्यक्तिगतरीत्या खूप मोठा फायदा झाला असल्याचे मत एमपीएससी स्पर्धा परीक्षेतून वित्त व लेखा अधिकारी (वर्ग 1) अधिकारी बनलेल्या प्रमोद सटाले व त्यांची पत्नी स्मिता प्रमोद साटले यांची तालुका वनाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल आसुबाई माध्य व उच्च माध्य विद्यालय, मांडेखेल शाळेच्यावतीने बुधवारी (दि 10) सहृदय सपत्नीक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे, उपाध्यक्ष एड.श्रीधर डिघोळे, संचालक मुरलीधर नागरगोजे, प्राचार्य सुरेश बुरांडे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना शाळेचे विद्यार्थी असलेले प्रमोद सटाले यांनी सांगितले की,इयत्ता पाचवी मध्येच माझा जो आत्मविश्वास माझ्या शिक्षकाने उंचवला त्याच विश्वासाच्या बळावर मी इथपर्यंत पोहोचू शकलो,स्पर्धा परीक्षांच्या शिक्षणासाठी वडिलांनी प्रसंगी पाच एकर जमीन विकली, सावकाराकडून कर्जही काढले तरी उच्च शिक्षणासाठी सतत प्रेरणा दिली याचाही अभिमान वाटतो इंग्रजी विषयाचा भीती न बाळगतात त्याची अधिक तयारी करून त्याचा फायदा करून उच्च शिक्षणामध्ये व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता येते. शालेय विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे धर्म आणि जातीपेक्षा केवळ शिक्षणच आपला आयुष्य बदलू शकते अशी भूमिका मांडली.एक अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा ते वित्त व लेखा अधिकारी या प्रवासामध्ये शाळेचा वाटा खूप मोठा आहे असेही त्यांनी सांगितले तर
प्रमोद सटले यांच्या पत्नी स्मिता सटले यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया व मोबाईलच्या अतिरिक्त वापरापासून दूर राहावे असा सल्ला दिला टीव्ही वर्तमानपत्राचा चांगला उपयोग करून आपले जनरल नॉलेज अधिक वृद्धिगत करावा असाही सल्ला दिला किशोरवयीन मुलींना बालविवाहामध्ये गुंतवून त्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका मुलींवर विश्वास ठेवा व त्यांच्या पंखांना बळ देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप करतेवेळी संस्थेचे उपाध्यक्ष एड.श्रीधर डिघोळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असेल तर ते परदेशातही नोकरी मिळवू शकतात व उच्च पदावर जाऊ शकतात.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य सुरेश बुरांडे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज. रा देशमुख तर आभार व्यक्त धनंजय वावळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्वच कर्मचारी व शालेय विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदवला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा