सोशल मीडियावरील 263 पोस्टही हटवल्या !
बीड पोलीसांचा सोशल मीडियावर वाॅच: 400 जणांना नोटीस, 16 गुन्हे दाखल; सोशल मीडियावरील 263 पोस्टही हटवल्या
बीड : जिल्ह्यातील जातीय वादावर आता कायदेशीर कारवाई सुरू झाली असून पोलिसांनी सोशल मीडिया अकाऊंटवरही वॉच ठेवला आहे. बीड लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मराठा विरुद्ध मराठेत्तर असा वाद पाहायला मिळाला. तर, निवडणुका पार पडल्यानंतरही त्याचे पडसाद दिसून येत आहेत. बीडमध्ये मराठा आणि मराठेत्तर असा थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. त्यातूनच हा वाद सोशल मीडियातून अधिक तीव्र होतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे, बीड पोलीस प्रशासन आता खडबडून जागं झालं आहे. बीड जिल्ह्यात जातीय सलोखा आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्याच, अनुषंगाने जिल्ह्यात 16 गुन्हे दाखल झाले आहेत.लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड जिल्ह्यात टोकाच्या जातीय द्वेष पसरवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होत झाल्याचं दिसून आलं. सोशल मीडियातील याच पोस्टमुळे अनेक ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला असून काही ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या आहेत.
400 जणांना नोटीसा
बीड पोलिसांनी आता सोशल मीडियावर वॉच ठेवायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जवळपास 200 जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. तर, 316 पोस्टपैकी 263 पोस्ट सोशल मीडियातून काढून टाकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर ज्या पोस्ट वायरल झाल्या होत्या, आणि त्याचा परिणाम हा जातीय तेढ निर्माण करण्यासाठी झाला, त्या सगळ्या पोस्ट पोलिसांनी सोशल मीडियातून हटवल्या आहेत. एवढेच नाही तर येणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, म्हणून सोशल मीडियावर टोकाचे लिखाण करणाऱ्या 400 पेक्षा जास्त जणांना बीड पोलिसांनी नोटीसही जारी केल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा