“चिऊ मला माफ कर, जरांगे तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय..”; भावनिक चिठ्ठी लिहित मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं
“चिऊ मला माफ कर, जरांगे तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय..”; भावनिक चिठ्ठी लिहित मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं
बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर काही तरुणांनी आत्महत्या केल्या. ही घटना ताजी असतानाच प्रसाद देठे या बार्शीतल्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं आहे. एक भावनिक चिठ्ठी लिहून या तरुणाने आत्महत्या केली आहे. मूळचे बार्शीचे असणारे प्रसाद देठे हे पुण्यात एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांनी आत्महत्या केली.
प्रसाद देठेंनी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे.
जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा.
मला माफ करा.
तुमचाच प्रसाद
मराठा आरक्षणासाठी प्रसाद देठेंचा जरांगेंना होता पाठिंबा
ही सुसाईड नोट लिहून प्रसाद देठे यांनी आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होते आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाल्यानंतर प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते. ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्याने पोस्ट टाकायचे. त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करुन मराठा आरक्षणाची भूमिका हिरीरिने मांडली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. जरांगे पाटील जिंदाबाद लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे , आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रसाद देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे. लिहिलेल्या चिठ्ठीत ‘फक्त मराठा आरक्षण मिळावे’, याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा