योगामुळे शाश्वत सुखासोबतच इह-परलोक साधतो !- गुरुकुलात "योगदिन" कार्यक्रमात स्वामी विद्यानंदजी यांचे विचार
योगामुळे शाश्वत सुखासोबतच इह-परलोक साधतो !- गुरुकुलात "योगदिन" कार्यक्रमात स्वामी विद्यानंदजी यांचे विचार
परळी वैजनाथ,दि.२१(प्रतिनिधी)--
समस्त शारीरिक व्याधी व मानसिक विकारांना नाहीसे करून जीवनात शाश्वत सुखाची प्राप्ती करण्याची गुरुकिल्ली म्हणजेच योगाचे अनुष्ठान होय. योगाच्या आठही अंगांचे श्रद्धेने पालन केल्यास मानवाचा इहलोक व परलोक साधला जातो, असे विचार योग व आयुर्वेदाचे अभ्यासक स्वामी विद्यानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.
येथील आर्य समाजातर्फे संचालित नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गुरुकुलाचे प्रमुख आचार्य श्री सत्येंद्रजी विद्योपासक यांनी सर्व ब्रह्मचारी विद्यार्थी, वानप्रस्थी, संन्यासी व कर्मचाऱ्यांना योगासनांचे प्रशिक्षण दिले. यावेळी ते म्हणाले की नियमित योगासने केल्याने शारीरिक रोग व विकार नाहीसे मानवाला उत्तम स्वास्थ्य लाभते. स्वामी विद्यानंद सरस्वती यांनी प्राणायामाचे विशुद्ध स्वरूप सांगून त्यांच्या विविध प्रकारांचे प्रशिक्षण दिले. यावेळी ते म्हणाले की प्राण हाच जीवांचा आधारभूत घटक असून जन्माला आल्यापासून हा आपला खरा सोबती आहे. प्राणायामामुळे मन व शरीराचे सर्व विकार नाहीसे होऊन आत्मिक बळ वाढीला व दीर्घायुष्य प्राप्त होते.
यावेळी शतायुषी संन्यासी स्वामी सोमानंदजी सरस्वती यांनीही योगा विषयी मार्गदर्शन करून योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. शेवटी शिक्षक श्री कृष्णा आर्य यांनी सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा