पंकजा मुंडे वडीगोद्रीत ; प्रा.लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला दिली भेट
पंकजा मुंडे वडीगोद्रीत ; प्रा.लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला दिली भेट
वंचितांच्या लढ्यासाठी मी सोबत ; सरकारने हे उपोषण सन्मानाने सोडवावं
जालना ।दिनांक १७।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज संध्याकाळी वडीगोद्री येथे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची उपोषण स्थळी जावून भेट घेतली. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता. दरम्यान वंचितांच्या लढ्यात मी या दोघांसोबत आहे. सरकारने सन्मानाने त्यांचे उपोषण सोडवून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीला धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. आज संध्याकाळी पंकजाताईंनी उपोषणाला भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, “दोन दिवस झाले मी अत्यंत विचित्र तीव्र दुःखी भावनांना सामोरे गेले आहे. मला भेटल्या भेटल्या लक्ष्मण दादा रडायला लागले. ताई, तुमच्या पराभवामुळे चार लोकांनी आत्महत्या केल्या, मला बघून रडू येतंय. परिस्थिती हाताळत असल्याने याला कोणतंही राजकीय वळण लागू नये. इथे मी यासाठी आले आहे की फक्त वंचित लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जाऊन त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकते आणि ते सरकारसमोर मांडण्याचा शब्द देते. धनंजय भाऊ कृषी मंत्री आहेत, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. त्यामुळे सरकारला तिथे जाऊन सांगण्याची गरज नाही. सरकारच इथे आहे, मी त्यांना इथंच सांगते.”
ओबीसी समाजाच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत
-------
माझी मागणी सर्वात महत्त्वाची आहे. आज माझं म्हणणं सर्वांनी ऐकावं अशी विनंती आहे. आंदोलन देशात कुणीही करु शकतं. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीत बसून न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. मी कुठली प्रतिनिधी म्हणून येथे आलेले नाही. तर मला असं वाटलं की, इथेसुद्धा मोठ्या नेत्यांनी येऊन आंदोलकांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत आणि न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे”, असंही पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या
*सरकारने या दोघांचंही उपोषण सन्मानाने सोडवावं*
----
लक्ष्मण हाके यांनी आज पाणी सोडलं आहे. पण त्यांचे चेहरे टवटवीत आहे, कारण संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. डोंगर, कपाऱ्यात जाऊन जीवन जगणारा हा माझा वंचित समाज आहे. या समाजाचा काय आवाज आहे, तो आवाज सरकारने ऐकायलाच पाहिजे, अशी माझी मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझी विनंती आहे, ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही ते आम्हाला समजावून सांगा. मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारणच नाही. पण चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले जात असतील तर ते मान्य नाही. सरकारने या दोन्ही जणांचे उपोषण सोडवण्यासाठी यावं. ज्याप्रकारे इतरांचं उपोषण सोडवलं जातं त्याच प्रमाणे सन्मानाने यांचं उपोषण सोडवलं जावं”, असं आवाहनही पंकजाताई मुंडेंनी केलं आहे.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा