पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली
नामदेवराव दादा क्षीरसागर यांच्या निधनाने जिल्ह्यातील एक प्रखर सामाजिक चळवळ आज शांत झाली - धनंजय मुंडे
नामदेवराव क्षीरसागर यांच्या निधनाने जिल्हयाने ज्येष्ठ आणि अभ्यासू पत्रकार गमावला - पंकजा मुंडे
पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली
बीड।दिनांक ०१।
दैनिक चंपावतीपत्रचे संपादक नामदेवराव क्षीरसागर यांच्या निधनाने जिल्ह्याने एक ज्येष्ठ आणि अभ्यासू पत्रकार गमावला आहे, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांच्या दुःखद निधनाने पत्रकारितेचे मोठे नुकसान झाले आहे. क्षीरसागर यांनी दैनिकाच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम तर केलेच याशिवाय बीडला रेल्वे आणण्यातही त्यांचे योगदान महत्वाचे होते. संस्कार प्रबोधिनीच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळ देखील त्यांनी उभी केली.बीड जिल्हा व मराठवाड्यातील जनसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडून न्याय मिळवून दिला. केवळ पत्रकारिताच
नव्हे तर विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम त्यांनी केले. एक मनमिळावू आणि व्यासंगी संपादक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने जिल्हा एका ज्येष्ठ व अभ्यासू संपादकाला मुकला असून पत्रकारितेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
नामदेवराव दादा क्षीरसागर यांच्या निधनाने जिल्ह्यातील एक प्रखर सामाजिक चळवळ आज शांत झाली - धनंजय मुंडे
मुंबई (दि. 01) - दै. चंपावती पत्र चे संपादक तथा बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेतील भीष्म पितामह नामदेवराव दादा क्षीरसागर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले असून नामदेवराव दादा यांच्या दुःखद निधनाने बीड जिल्ह्यातील एक प्रखर सामाजिक चळवळ आज शांत झाली, अशा शब्दात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शोक व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी कृती समितीचे निमंत्रक म्हणून नामदेवराव दादा क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्याच्या महत्त्वकांक्षी अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाच्या कामासाठी अनेक वर्षांपासून मोठी चळवळ उभी केली होती. बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेतील भीष्मपितामह तसेच चंपावती रत्न अशी देखील नामदेवराव दादा क्षीरसागर यांची महती होती.
आज वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले असून आपल्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक व आदर्श असे व्यक्तिमत्व असलेले नामदेवराव दादा क्षीरसागर यांच्या निधनाबद्दल मी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण करतो, तसेच क्षीरसागर परिवार व दैनिक चंपावती पत्र परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे व नामदेवराव क्षीरसागर यांच्यात अखेरची भेट झाली तेव्हा सुद्धा बीड रेल्वे यांसह बीड जिल्ह्यातील विकासकामांच्या संदर्भातच दादांनी श्री मुंडे यांच्याशी चर्चा केली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा