संतांच्या आनंदी जगाचे स्वप्न संविधानानेच पूर्ण होईल-ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचा आशावाद
संतांच्या आनंदी जगाचे स्वप्न संविधानानेच पूर्ण होईल-ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचा आशावाद
नाशिक : ‘गेल्या सातशे वर्षांपासून संतांनी जे आनंदी जगाचे स्वप्न पाहिले तेच साकार करणारे भारतीय संविधान आहे. संतांनी ज्या विचारांचा जागर या महाराष्ट्रात सात शतके केला त्याच विचारांचा विजय म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला.’ असे प्रतिपादन ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. डॉ नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेतील 227 वे पुष्प ‘संत साहित्यातील संविधान मूल्ये’ या विषयावर गुफतांना ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर बोलत होते.
ह. भ. प. सोन्नर यांनी म्हटले की, भारतीय संविधान म्हणजे हिंदूंच्या विरोधातील कारस्थान असल्याचा अपप्रचार काही लोक कीर्तनाच्या माध्यमातून करीत असतात. परंतु वेगवेगळ्या संतांच्या अभंगांचे दाखले देत ह.भ.प. सोन्नर यांनी स्पष्ट केले की समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय याच मूल्यांचा जागर करत संतांनी आनंदी जगाचे स्वप्न पाहिले आणि तीच मूल्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात समाविष्ट केलेली आहेत. आपलं संविधान अमेरिकेपेक्षा प्रगल्भ असल्याचा पुरावा देताना ह.भ.प. सोन्नर म्हणाले की, अमेरिकेत आजपर्यंत राष्ट्राध्यक्ष पदी कोणीही महिला आलेली बसू शकली नाही, भारतात मात्र पंतप्रधान, राष्ट्रपती यांपासून अनेक पदे महिलांनी भूषविली आहेत, भूषवत आहेत. हीच भारतीय संविधानाच सर्वसमावेशता आहे. त्यांनी संत चोखामेळा यांच्या अभंगाचा दाखला देत सांगितले की, गावकुसाबाहेर राहणा-या चोखोबांना अभिव्यक्त होण्याचे माध्यम वारकरी परंपरेतील अभंगाने दिले. ही एकप्रकारे संविधातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सुरुवात होती. सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तरांचे सत्र झाले.
व्याख्यानाचे प्रास्ताविक सचिन मालेगावकर यांनी, वक्त्याचा परिचय अरुण घोडेराव यांनी तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या आयोजक संघटनेचा परिचय नितीन बागुल यांनी करून दिला. डॉ. शामसुंदर झळके यांनी आभार व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा