महायुती सरकारच्या शपथविधी आधी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी परळीतून महायुती सरकारला दिला महत्त्वाचा संदेश
परळी वैजनाथ-...
श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील श्री. रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी धर्मशास्त्र, मुहूर्त व प्राणप्रतिष्ठा या संबंधाने केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या ज्योतिर्मठ बद्रीनाथ येथील जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारला मात्र आशिर्वाद दिले आहेत. गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महायुतीचे सरकार असल्याने त्यांना गोमातेचे आशिर्वाद मिळाले आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे सरकार होत असल्याचे वक्तव्य बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्रामधून केले. महायुती सरकारचा आज शपथविधी होत आहे. या अनुषंगाने शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारला धर्माधिष्ठित राज्यसत्ता चालवा असा महत्त्वाचा शुभ संदेश दिला आहे.
परमाराध्य' परमधर्माधीश उत्तरामनाय ज्योतीष्पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती '१००८' (ज्योतिर्मठ, बद्रिनाथ, उत्तरांचल) यांनी आज बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथाचे पूजन करून मनोभावे दर्शन घेतले. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्रीविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे एका कार्यक्रमानिमित्त परळीत आले होते. त्यांनी आवर्जून ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात येत पूजाअर्चा केली व मनोभावे दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे ज्योतिर्लिंग हे परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आत्मिक समाधानाची निश्चित अनुभूती होते. धर्म आणि देव यांच्याशी एकरूपतेने प्रत्येकाने आचरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या विकासाच्या दृष्टीने स्थानिक भक्त आणि लोकसहभागाने आपली संस्कृती जतन करण्याच्या दृष्टीने विकास कामे झाली पाहिजेत असे मतही त्यांनी व्यक्त केले. दरम्यान आज महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होत असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत आहे. या नव्या सरकारला आपला काय संदेश असेल या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, धर्माधिष्ठित राज्यसत्ता राबवणाऱ्या सरकारच्या पाठीशी सर्व जनता राहत असते. गोमाता संरक्षण व संवर्धनासाठी आपण देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांना आवाहन केले होते. त्यासाठी आंदोलनही केले होते. या आवाहनाला महाराष्ट्रातील सरकारने उत्स्फूर्त प्रतिसाद देत राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा देऊन गोमाता संरक्षण व संवर्धनासाठी धोरण राबवले आहे. या सरकारच्या पाठीशी गोमातेचाच आशीर्वाद असल्याने पुन्हा एकदा महायुतीला सरकार स्थापन करण्याची ही संधी त्यांना मिळाली आहे. आगामी काळातही महायुती सरकारने धर्माधिष्ठित राज्यसत्ता राबवावी व सर्व लोकांच्या उन्नतीसाठी काम करावे असा महत्वपूर्ण संदेश प.पु. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती स्वामी यांनी यावेळी दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा