विद्यार्थिनींना स्व संरक्षण ही काळाची गरज- प्राचार्य अतुल दुबे
परळी वैजनाथ दि.२४ (प्रतिनिधी)
आजच्या काळात घडणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घडणाऱ्या घटना पाहता विद्यार्थिनींना स्व संरक्षण करणे काळाची गरज निर्माण झाली असल्याचे मत यशवंतराव चव्हाण कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल दुबे व्यक्त केले आहे.
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तालुक्यातील सेलू (परळी) येथे विशेष युवती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात प्राचार्य अतुल दुबे बोलत होते. या कार्यक्रमात पत्रकार प्रा रविंद्र जोशी, कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विनोद जगतकर, प्रा डॉ राजश्री कल्याणकर, प्रा डॉ रंजना शहाणे, प्रा डॉ विना भांगे, प्रा पी एम फुटके उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य दुबे म्हणाले की, आज संपूर्ण भारतात महिला व युवतीवरील अत्याचारात वाढ झाली आहे. यासाठी विद्यार्थिनींनी स्व संरक्षण करण्यासाठी तयार झाले पाहिजे. तर प्रा जोशी यांनी सांगितले की, आजच्या परिस्थितीत महिलांना सहजीवन साथी म्हणून दर्जा दिला पाहिजे. पुरुषांच्या बरोबरीने वागवले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने स्त्री, पुरुष समानता निर्माण होईल. शिबीरात सकाळच्या सत्रात सेलू गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवत गावात स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या सातपुते हीने तर प्रास्ताविक प्रा.प्रविण फुटके यांनी केले. आभार गौरी पुजारी हिने मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा