शरद पवार पक्षाकडून सवाल !
परळी नगरपालिकेचं नेमकं चाललयं काय? नगर पालिकेकडून महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आयोजित केलेत की नाही ?
परंपरेप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे - अँड जीवनराव देशमुख
परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)
नगरपालिकेच्या स्थापनेपासून महाशिवरात्री निमित्त शहरात कुस्त्यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते पण यंदा नगरपालिकेने आणखीनही कोणते कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत याची माहिती दिली नाही. महाशिवरात्री दोन दिवसांवर आलेली असताना एकही कार्यक्रम आयोजित केला नाही,तो परंपरेप्रमाणे आयोजित करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अँड जीवनराव देशमुख यांनी केली आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग शहरात आहे. अनादी काळापासून महाशिवरात्री महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये येथील नगरपालिकेच्या स्थापनेपासून नगरपालिकेच्या वतीने या शिवरात्री महोत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा प्रशासक म्हणून मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे आहेत यांनी या कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. तसेच काय कार्यक्रम आयोजित केले आहेत याची माहिती शहरवासीयांना देणे गरजेचे आहे. अवघ्या दोन दिवसांवर महाशिवरात्री महोत्सव साजरा होत असताना नगरपालिकेने मात्र अद्यापही कोणत्याही कार्यक्रमांची घोषणा केलेली नाही. इतर सामाजिक संस्था, मंदिर प्रशासन यांनी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पण नगरपालिका मात्र झोपेचे सोंग घेत आहे. नगरपालिकेने लवकरात लवकर जंगी कुस्त्यांसह विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करावेत तसेच शहरात मुख्य रस्त्यासह मंदिराकडे जाणाऱ्या विविध रस्त्यावरील लाईट बंद आहेत त्या दुरुस्त कराव्यात कारण परळीकर नागरिक, महिला मोठ्या संख्येने रात्री, अपरात्री या कालावधीत दर्शनासाठी जात असतात यासाठी सर्व पोलवरील लाईट दुरुस्त कराव्यात अशी मागणी अँड जीवनराव देशमुख यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा