वाण धरणातील व अंबलवाडी धरणातील पाणी नदीपात्रात सोडा-फुलचंद कराड
परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- परळी तालुक्यातील वाण धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. वाण अंबलवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून वाण नदीपात्रात सोडावे, जेणे करुन परिसरातील शेतकरी बांधवांच्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल, प्रशासनाने लवकरात लवकर वाण धरणाचे पाणी नदीपात्रात सोडावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जेष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती व वाणधरण शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष फुलचंद कराड यांनी केली आहे.
परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणाखालील व नदीपात्राच्या दोन्ही बाजुची कार्यक्षेत्रातील गावाच्या पिण्याच्या पाण्याचा सोर्स विहिरी नळयोजना नदीपात्रातून आहे. आता नदीपात्र आटले आहे. त्यामुळे विहिरीचे पाणी आटल्यामुळे अनेक गावांना पिण्याचे पाणी नाही, जनावरांनाही नदी शिवारात पाणी नाही, पाखरे पाण्यावाचून मरताहेत, मला गेल्या 4 दिवसात अनेक गावचे सरंच गावकरी भेटले आहेत. पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे. मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून अखंडपणे हे काम दरवर्षी करत असतो व धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी पाठपुरावा करत असतो. येत्या 2 दिवसात शिष्टमंडळ घेवून बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक साहेबांना भेटणार आहे.
गुढीपाडव्यापासून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करणार आहे. जेंव्हा श्री केंद्रेकर जिल्हाधिकारी होते. तेंव्हा आम्ही त्यांना भेटलो ते म्हणाले आमचे अधिकारी इंजि.ला घेऊन धरणावर येतो, पाहणी करतील मगच पाणी सोडले जाईल. आम्हाला न सांगता गुप्तपणे श्री केंद्रेकर साहेबांनी पाठक साहेबांना धरणाची पाहणी करायला पाठवले. नंतरच पाणी सोडले. यंदा तर धरणात पाणी भरपूर आहे. धरण तुडूंब भरलेले आहे.अंबलवाडी, नागापूर, लिंबुटा, बहादूरवाडी, पांगरी, गावचे तांडे, सबदराबाद, नाथ्रा, तळेगाव, माळहिवरा, तडोळी, वडखेल, कौठळी, देशमुख टाकळी आदी गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. जनावरे, पाखरे यांचाही पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही पाणी सोडण्याबाबत प्रशासन आपल्या सहकार्य करतील अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जेष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती व वाणधरण शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष व मार्गदर्शक फुलचंदभाऊ कराड यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा