रोहिण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना आणणार
मुख्यमंत्री आपल्यासोबत, त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुजलाम् सुफलाम् होईल
मुख्यमंत्र्यांनी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा - ना. पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केली इच्छा
घाटशीळ पारगांवच्या फिरत्या नारळी सप्ताहात भाविकांची अलोट गर्दी
बीड।दिनांक १९।
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या विकासा करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वीपासूनच खूप सहकार्य लाभले आहे, मी पालकमंत्री असताना त्यांच्या सहकार्यामुळेच इथली कामे करू शकले. मुख्यमंत्र्यांनी आता हा गड दत्तक घ्यावा, अशी अपेक्षा राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत, त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुफलाम् सुफलाम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांचा ९३ वा नारळी सप्ताहाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मठाधिपती विठ्ठल बाबा महाराज, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा, आ. मोनिका राजळे, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, सरपंच नवनाथ खेडकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना. पंकजाताई म्हणाल्या, हा जिल्हा दुष्काळी आहे, इथल्या लोकांना सन्मार्ग आणि भक्ती मार्गाकडे नेण्यासाठी संत वामनभाऊ, संत भगवान बाबा यांनी नारळी सप्ताहाची परंपरा सुरू केली. ही परंपरा थोर आहे, ती आजही अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे या भागातील लोकांना आध्यात्मिक गोडी निर्माण झाली आहे. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी तसेच बीड जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी मुख्यमंत्री महोदय आपल्यासोबत आहेत, सत्तेशिवाय विकास होवू शकत नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा गड दत्तक घ्यावा. गड दत्तक घेणे म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येकाचा विकास करणे आहे, त्यामुळे येत्या काळात जिल्हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.
मुंडे साहेबांचे नाव कधीही कमी होऊ देणार नाही
--------
मी राजकारणात आले त्यावेळी लोकनेते मुंडे साहेबांनी मला या गडावर आणले होते, एक दोन वेळा मला अडचणीमुळे गडावर येता आले नव्हते पण दरवर्षी मी गडावर एक भक्त म्हणून आवर्जून येते. गडाच्या विकासाकरिता सातत्याने प्रयत्न केले. मुंडे साहेबांचे संस्कार असल्याने सर्व सामान्यांसाठी तसेच समाजातील सर्व घटकांसाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे व पुढेही राहिल. मुंडे साहेबांचे नाव मी कधीही कमी होऊ देणार नाही, असंच काम माझ्या हातून होईल असं ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.
रोहिण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना आणणार
-------
लातूर जिल्हयात रोहिणा (ता. चाकूर) येथे ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून लोकनेते मुंडे साहेबांचे मंदिर बांधले आहे, त्याचा कलशारोहण आज माझ्या हस्ते होता पण मुख्यमंत्र्यांच्या दौर्यामुळे मला तिकडे जाता आले नाही. तिथले लोकं खूप नाराज झाले, त्यांना मी शब्द दिलाय की मुख्यमंत्र्यांना घेऊनच तुमच्या कार्यक्रमाला येईल त्यामुळं आपण तो शब्द पाळावा आणि पुढच्या वेळी कार्यक्रमाला यावे असे ना. पंकजाताई म्हणाल्या.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा