जालना:अकोल्यात आगीची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा !
पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश ; आगीच्या घटनेची माहिती जाणून घेत व्यक्त केल्या संवेदना
जालना ।दिनांक १०।
अकोला (ता. बदनापूर) गावातील मठवाडी परिसरात आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या धान्य पिकांचे तसेच जखमी पशूंचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी असे आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेत पालकमंत्र्यांनी या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली आहे.
अकोला गावातील गट क्रमांक ४१ मधील मठवाडी परिसरात आज दुपारी पोलवरील विजेच्या तारांचे घर्षण होऊन अचानक आग लागली. या आगीमुळे शेतातील गहू, हरभरा, तूर या धान्याचे तसेच चारा, गाडी बैल, पशू खाद्य, मोटर पाईपलाईन याचे मोठे नुकसान झाले. शेतात असलेली काही जनावरे देखील आगीत होरपळली. आग लागल्याचे कळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले.
पालकमंत्र्यांनी घेतली दखल
-------------
पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, बदनापूरच्या तहसीलदार आश्विनी डमरे यांच्याकडून आगीच्या घटनेची माहिती जाणून घेतली आणि झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे दिले आहेत. आगीत होरपळलेल्या जखमी पशूंवर तातडीने उपचार करण्यासही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेबाबत आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा