गुरुसेवेचा भाव सदैव स्थिर असला पाहिजे, त्यात अस्थिरता आली तर साधकाची साधना फळाला येत नाही- प.पू. मकरंद महाराज
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
गुरुतत्त्वाचा बोध घ्यायचा असेल तर सेवावृत्ती धारण करावी लागते. जोपर्यंत गुरुचरणी 'सेवेलागी सेवक झालो' या न्यायाने आपण लीन होत नाही तोपर्यंत गुरुकृपा प्राप्त होत नाही. गुरुप्रती असलेला सेवाभाव स्थिर असला पाहिजे. तो भाव अस्थिर झाला तर साधकाला प्राप्त होणारी साधनेची फलश्रुती मिळत नाही असे प्रतिपादन दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प.पू. मकरंद महाराज यांनी केले.
बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग स्थान श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुतत्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुचरित्र सारामृत पारायण सोहळा होत आहे.त्याचबरोबर दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प.पू. मकरंद महाराज यांच्या रसाळ वाणीतून सायंकाळ सत्रामध्ये गुरुचरित्र कथामृतही ऐकायला मिळत आहे. आज दुसऱ्या दिवशीच्या कथामृत सोहळ्यात गुरु महिमा विशद करताना प.पू. मकरंद महाराज यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून गुरुचरित्र साराचे विवेचन केले. गुरु हे कृपाळू असतात. त्यांची कृपा ही जीवनातील सर्वोत्तम अशी बाब असते. मात्र गुरुकृपा ही सहजासहजी प्राप्त होणारी बाब नाही.
गुरुकृपा लाभणे हे दुर्लभ आहे. मात्र गुरु सेवे शिवाय गुरुकृपा प्राप्त होत नाही. त्यातही गुरु सेवेचा जो भाव साधकाच्या मनात असतो तो सदैव स्थिर राहिला पाहिजे. ज्याही वेळी सेवेचा भाव अस्थिर होईल त्यावेळी साधनेत विक्षेप येतो आणि त्या साधनेतून प्राप्त होणारी फलश्रुती त्या साधकाला प्राप्त होत नाही. त्यामुळे गुरु सेवेला आनन्य साधारण महत्व असल्याचे प.पू.मकरंद महाराज यांनी सांगितले. या कथामृत श्रवणाला मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून परळी वैजनाथ येथे सुरू असलेल्या गुरुचरित्र सारामृत पारायण सोहळ्याला मोठा प्रतिसाद लाभत असुन या ठिकाणी भाविक गुरुचरित्र सारामृत दैनंदिन पारायण करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा