नगर परिषदेला निवेदन....
प्रभू वैद्यनाथ मंदिर : 241 वर्षांपूर्वीच्या पायऱ्या; पुरातन पवित्र दगडांचे जतन करावे : अश्विन मोगरकर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात अनेक कामे चालू आहेत. त्यापैकी मंदिराच्या पूर्व घाटावर आवश्यकता नसतानाही व प्रशासकीय मान्यता नसताना मंदिराच्या पूर्व घाटावरील पायऱ्या काढून नव्या दगडात पायऱ्या टाकण्यात येत आहेत. त्या पुरातन पायऱ्यांच्या पवित्र दगडांचे जतन करावे अशी मागणी भाजपा पदाधिकारी अश्विन मोगरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इसवीसन १७८४ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करताना हा पूर्व घाट बांधलेला होता. २४१ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या घाटाच्या पायऱ्या अजूनही सुस्थितीत होत्या. या पायऱ्यांचे पौराणिक महत्व खूप मोठे आहे. पूर्व पायऱ्यांचे दर्शन घेऊन मगच वैद्यनाथाचे दर्शन घेण्याची प्रथा पाळली जाते. या पूर्व दिशेच्या पायऱ्यांवर कार्तिक महिन्यात सूर्यनारायण काढून पूजा करण्याची अनादी काळापासून परंपरा आहे.
काढलेल्या सर्व पायऱ्यांच्या दगडांचा भविष्यात मंदिरातील कामात उपयोग व्हावा व प्रभू वैद्यनाथ भक्तांच्या धार्मिक भावनांचा आदर व्हावा यासाठी या पायऱ्यांचे जतन होणे आवश्यक आहे. परळी नगर परिषदेकडे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास योजनेत होत असलेल्या कामाचे नियंत्रण व लक्ष ठेवण्याची जबाबदारी निश्चित आहे.
या अनुषंगाने भाजपा पदाधिकारी अश्विन मोगरकर यांनी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक कांबळे यांची मंगळवार दि. १३ मे रोजी भेट घेऊन निवेदन दिले. प्रशासनाने या प्रकरणात त्वरित व संवेदनशीलपणे दखल घ्यावी अन्यथा परळी नगरपरिषदेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही अश्विन मोगरकर यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा