विद्यार्थी आणि पालकांची मागणी: 'मुदतवाढ द्या!'
अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आजच; अनेक विद्यार्थी अद्यापही प्रक्रियेबाहेर – मुदतवाढीची मागणी तीव्र
परळी वैजनाथ| ५ जून २०२५
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आज, म्हणजेच ५ जून २०२५ आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेतील नोंदणी २६ मेपासून सुरू झाली होती आणि ती सुरुवातीला ३ जूनपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांची वाढती गर्दी व नोंदणी अपूर्ण राहण्याच्या तक्रारी लक्षात घेऊन अंतिम तारीख ५ जूनपर्यंत वाढवण्यात आली होती.
प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
- नोंदणी व ऑनलाइन अर्ज: २६ मे ते ५ जून २०२५
- तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर: ५ जून सकाळी ११ वाजता
- आक्षेप नोंदवणे आणि दुरुस्ती: ६ जून ते ७ जून
- अंतिम गुणवत्ता यादी: ८ जून सायंकाळी ४ वाजता
अनेक विद्यार्थी अद्याप प्रक्रियेबाहेर
अर्ज भरण्याची मुदत संपत आली असताना अनेक विद्यार्थी व पालक अजूनही नोंदणी करू शकलेले नाहीत. अनेक शाळांमध्ये अद्याप निकाल उशिरा लागल्याने किंवा तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी नोंदणीपासून वंचित राहिले आहेत. काही ठिकाणी वेबसाईटवरील स्लो प्रतिसाद, OTP न येणे, किंवा दस्तऐवज अपलोड करताना अडचणी निर्माण झाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.
विद्यार्थी आणि पालकांची मागणी: 'मुदतवाढ द्या!'
विद्यार्थ्यांसह पालक संघटनांनी शिक्षण विभागाकडे प्रवेशासाठीची नोंदणीची अंतिम मुदत किमान २-३ दिवसांनी वाढवावी, अशी जोरदार मागणी केली आहे. "अनेक विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवशी अर्ज करण्याचा विचार केला होता, पण तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे अर्ज पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे संधी मिळावी," असे मत अनेकांनी व्यक्त केले.
शिक्षण विभागाकडून अद्याप निर्णय नाही
शिक्षण विभागाने यापूर्वी एकदा मुदत वाढवली असली तरी पुढील वाढीबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घोषित करण्यात आलेला नाही. मात्र विद्यार्थ्यांची संख्या व मागणी लक्षात घेता लवकरच निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.
पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेश पोर्टलवर (https://11thadmission.org.in) सातत्याने लक्ष ठेवावे आणि अधिकृत सुचनांची वाट पाहावी, असे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा