परळी वैजनाथ नगर परिषदेचा नेहमीप्रमाणेच अंध:कारमय कारभार !
गजानन महाराज पालखी सोहळा अंधारातच मार्गस्थ, भक्तगणांमध्ये संतापाचा सूर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –
संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत जगमित्रनागा मंदिर ते आझाद चौक या मार्गावर आज (२१ जून) पहाटे ५ वाजता पालखी मार्गस्थ झाली. मात्र, यावेळी संपूर्ण पालखी मार्गावरील पथदिवे बंद होते. परिणामी, पालखी अंधारात मार्गस्थ होण्याची नामुष्की पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ओढवली.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने भाविकांनी पहाटे लवकर उठून पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. मात्र, शहरातील मुख्य पालखी मार्गावरील पथदिवे बंद असल्याने संपूर्ण मार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. परिणामी, पालखी अंधारात पुढे जावी लागली. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून नगर परिषदेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि सोहळ्याच्या शिस्तबद्धतेसाठी प्रकाशव्यवस्था अत्यंत आवश्यक असते. तरीदेखील प्रशासनाने याबाबत कोणतीही पूर्वतयारी न करता निष्काळजीपणाच दर्शविला आहे. शहरात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना स्थानिक प्रशासनाची मदत मिळावी हीच अपेक्षा असते, मात्र परळी नगर परिषद वारंवार अशीच उदासीनता दाखवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिक तसेच भाविकांनी नगर परिषदेच्या या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त करत जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकारामुळे प्रशासनाचा नियोजनशून्य आणि असंवेदनशील कारभार पुन्हा एकदा उजेडात आला आहे.
पालखी अंधारातच मार्गस्थ?
- संत जगमित्रनागा मंदिर ते आझाद चौक दरम्यान सर्व पथदिवे बंद
- पालखी मार्गावर पथदिवे चालू नव्हते
- भाविक भक्तांमध्ये चीड
- नगर परिषदेच्या नियोजनाचा अभाव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा